पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Election) घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट सामना होणार आहे. त्यामुळे, दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून बहुतांश जागांवर एकमत झालं आहे. त्यात, महाविकास आघाडीत शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होण्यापूर्वीच काही जागांवर उमेदवार घोषित केले जात आहेत. त्यामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) आज आणखी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तत्पूर्वी, आमदार रोहित पवार व समरजीत घाटगे यांचीही उमेदवारी जाहीर झाली होती. आता, शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुण्यातील जागावाटप व मतदारसंघाबाबत माहिती दिली. 


शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जागावाटपावर भाष्य करताना पुण्यातील हडपरसर मतदारसंघातील उमेदवारच घोषित केला आहे. पुण्यातील हडपसर विधानसभेची जागा उबाठा शिवसेना गट लढणार आहे, येथील मतदारसंघातून महादेव बाबर हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. तसेच, पुणे जिल्ह्यातील इतर काही जागांबाबत चर्चा सुरू आहे, पुण्यात 15 ते 18 जागांबाबत निर्णय राहिला आहे. तर, 7 ते 9 जागांवर एनसीपीएसपी व उबाठा आणि इतर जागांवर काँग्रेस अशी चर्चा झाल्याची माहिती अंधारेंनी दिली. त्यामुळे, पुण्यातील जागावाटपाचं गणितच अंधारेंनी उलगडलं आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, महाविकास आघाडीत हडपसरची जागा ही शिवसेना युबीटी उमेदवाराचीच असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे, महाविकास आगाघाडीमधील दोन्ही पक्ष यास मान्यता देतील का, हे पाहावे लागेल.  


उद्या बैठक


जागावाटपाबाबत उद्या एक महत्वाची बैठक होणार, आज उद्या सर्व्हे पूर्ण झालेले असतील. काही जागांबाबत चर्चा सुरू राहील, वडगावशेरी किंवा इतर काही जागांबाबत चर्चा होतील, इकडे तिकडे काही उमेदवार असतील, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले. आम्ही पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी अशी प्रत्येक कार्यकर्ता म्हणून इच्छा असते, असेही त्यांनी म्हटलं. 


नीलम गोऱ्हेंनी निवडणूक लढवावी


नीलम गोऱ्हे यांनी निवडणूक लढवावी, त्यांची पत किती आहे हे बघावे. मुख्यमंत्र्‍यांनी लाडकी बहीण म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात का लढावी, त्यांचा माझा काहीही संबंध नाही लढायचं, संघटन नाही, लोकं नाहीत. वशिल्याने कोणी पुढे गेले तर ते हुशार असतात, असे नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना चॅलेंजही दिलंय. 


अक्षय शिंदे एन्काऊंटबाबत खुलासा करणार


पुणे पोलिस प्रशासनात आनंदी आनंद आहे, आरोपी सापडत नाहीत. मी अक्षय शिंदे एन्काऊंटरबाबत मोठा खुलासा एक दोन दिवसात करणार आहे, आपटे याला अटक करण्याची वेळ बरोबर निवडली, अटकेचा फास करण्यात आला, आपटे सरकारच्या निगराणीखाली सुरक्षित होता, शिंदे अनेक खुलासे करणार होता, आपटेसाठी शिंदेचा खात्मा करण्यात आला, असे अनेक खुलासे करणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 


मनसेला टोला


ज्या लोकांच्या हो किंवा नाही म्हंटल्यावर राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही, त्यावर काय बोलायचं, असे म्हणत मनसेची खिल्ली उडवली. 


फडणवीसांसह सरकारवर हल्लाबोल


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत भंडारा हातात उधळून खोटं आश्वासन दिल होतं, प्रत्येकवेळी फडणवीस खोटं बोलतात आश्वासन पूर्ण करत नाहीत, असे म्हणत धनगर आरक्षणाचा प्रश्न अद्याप कायम असल्यावरुन सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच, सरकारं घोषणांचा पाऊस पडत आहेत, घोषणांची खैरात मतावर डोळा ठेवून योजना जाहीर केल्या जात आहेत. त्यामुळे एकीकडे पगार द्यायला पैसे नाहीत तर दुसरीकडे आश्वासन दिले जातात, असे म्हणत सरकारच्या धोरणांवरही अंधारे यांनी टीका केली.


हेही वाचा 


महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?