मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. दरम्यान, नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असताना राजीनामा देण्याची गरज नव्हती अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समोर येणार आहे. सह्याद्रीवरील मंत्रीमंडळ बैठकीनंतर याबाबत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे.


आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार : पवार
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. "विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं, आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले. नवी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


पक्षासाठी हा निर्णय घेत असल्याचं नाना पटोले यांनी सगळ्यांना कळवलं होतं. त्यांनी ही पक्षीय जबाबादारी घेतली आहे. हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. असं शरद पवारांनी सांगितलं. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "आता बघू चर्चेनंतर ठरवू. जागा रिक्त झालेली आहे, आता सगळेच पक्ष त्याच्यावर चर्चा करु शकतात."


काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाना पटोले यांनी बुधवारी (3 फेब्रुवारी) राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे.


Maharashtra Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार?