मुंबई : मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. मात्र, त्यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे भाजप मनसे युती होणार का? या चर्चेला सुरुवात झाली आहे.


"शिवसेनेची सत्ता खाली खेचण्यासाठी जे करता येईल ते करू" कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी हे विधान केलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रसाद लाड यांचे स्वागत केलं. जवळपास पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.


Balasaheb Thackeray Birth Anniversary | महाराष्ट्रातील भाजपच्या अस्तित्त्वाचं श्रेयही बाळासाहेबांचं- संजय राऊत


कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही
राज ठाकरे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीवर भेटीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही आधीपासूनच अभ्यासाची तयारी केली आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही कुणी कुणाची भेट घेतली तरी फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिलीय. तर महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर आमच्यासमोर कोणीही टिकणार नाही, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणालेत.


गेल्या काही दिवसात मनसेने आपल्या इंजिनचा ट्रॅक बदलला आहे. पंचरंगी झेंडा आता भगवा झालाय. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहे. शिवाय मनसे आणि भाजपचा शत्रूही एकच आहे तो म्हणजे शिवसेना. त्यामुळे या मुद्द्यावरून युती होऊ शकते पण उत्तर भारतीयांविरोधातील मनसेची भूमिका या युतीला मारक ठरू शकते. आता मनसे हिंदुत्ववादी कार्ड कट्टर करत उत्तर भारतीयांविरोधातील आवाज सौम्य करते का आणि महापालिकेसाठी भाजप-मनसे युती होते काम हे पहाणं महत्त्वाचं आहे.