Shirdi News शिर्डी : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोपरगाव मतदारसंघातील भाजप युवा नेते विरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यातील कलह अनेकदा समोर आलाय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोल्हे यांच्या गटाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री निधी देताना दूजाभाव असल्याचा आरोप करत युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी आज मोर्चा काढून भाजपच्याच पालकमंत्र्यांवर टीका करून घरचा आहेर दिला आहे.


2019 साली विधानसभा निवडणुकीत भाजपच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता. आपल्या पराभवाला विखे पाटील कारणीभूत असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. तेव्हापासूनच कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष अहमदनगर जिल्ह्यात अनेकदा समोर आलाय. 


विवेक कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता मतदारसंघातील गणेश साखर कारखाना निवडणूक असो किंवा राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विखेंविरोधात निवडणूक लढवत विखेंना शह दिला होता. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री कोपरगाव मतदारसंघात निधी वाटप करताना दुजाभाव करत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याने आज भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.


मोर्चेकर्‍यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध


यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकर्‍यांनी पालकमंत्र्यांचा निषेध केला. गरीबी असली की लाजू नये. श्रीमंती आली की माजू नये आणि सत्ता आली की गाजवू नये असा टोला कोल्हे यांनी नाव न घेता विखे पाटील यांना लगावताना यापुढे आंदोलन करणार नाही. मात्र 50 वर्षांची सत्ता उलटवण्यात मी नेतृत्व करेल, असा इशारा कोल्हे यांनी भाषणातून दिला आहे


पालकमंत्री कसा त्रास देतात याचा पाढाच वाचला


आंदोलनानंतर पत्रकारांशी विवेक कोल्हे यांनी संवाद साधताना पालकमंत्री कशा पद्धतीने त्रास देत आहे याचा पाढाच वाचला. भविष्यात वेळ आली तर कोणताही पर्याय निवडू असा थेट इशाराच भाजप पक्ष नेतृत्वाला कोल्हे यांनी दिला आहे. विरोधी सरकार असताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा सत्तेत असताना होतोय. दलितांच्या हक्काचा निधी डावलला. विखे पाटलांच्या विरोधात गेलेल्या ग्रामपंचायतींना एकही रुपयांचा निधी दिलेला नाही. आमची सत्ता आहे. जिल्हा बँकेत आमचं कर्ज मंजुरीचे पत्र असूनही गणेश कारखान्याला मदत मिळत नाही, असा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे. 


भाजपासाठी काम करतो की विखे पाटलांसाठी हेच कळत नाही


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र त्यांची काय मजबुरी आहे ते कळायला मार्ग नाही. भाजपने आमच्या कडून बूथ कमिटीची कामे करून घेतली आणि सगळा डेटा आज विखे यांच्या कार्यालयात गेला. नेमकं भाजपसाठी काम करतो की विखे पाटलांसाठी हेच आमच्या कार्यकर्त्यांना कळेना झालय. आमच्याकडे काय पर्याय उरतो हे तुम्हीच सांगा. संघर्ष करणार आमचे नेतृत्व आहे. आम्ही गुडघ्यावर बसून पाय चेपण्याचे आमदार आशुतोष काळे सारखे धोरण घेऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात हरू किंवा जिंकू मात्र सत्यासाठी कोणतीही भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 


आणखी वाचा 


शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात, प्रस्थापित हिरे घराण्याचा पराभव, सलग चार वेळा आमदार, अशी आहे मंत्री दादा भुसेंची राजकीय कारकीर्द