धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे निवडणुकांमध्ये अधिक सक्रीय होतात. अनेकदा त्यांचे वय आणि तब्येतीवरुन त्यांच्यासाठी काळजी व्यक्त केली जाते. मात्र, मी अजूनही तरुण आहे असे म्हणत शरद पवारांनी गत विधानसभा निवडणुकीत करिश्मा दाखवून दिला होता. साताऱ्यातील सभेत भरपावसात शरद पवारांनी सभा गाजवली होती. त्यानंतर, 80 वर्षाचा तरुण हे विशेषण लावत शरद पवारांचे देशभरातून कौतुक झालं. आता, वयाच्या 84 व्या वर्षीही ते त्याच ऊर्जा आणि इच्छाशक्तीने लोकसभेच्या (Loksabha) रणांगणात उतरले आहेत. एका दिवसात 4-4 ठिकाणी सभा घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. बुधवारी धाराशिव जिल्ह्यात त्याची सभा पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सासरवाडीतील मतदारसंघात शरद पवारांनी सभा गाजवली. आपला घसा बसला असतानाही मी देशातील परिस्थिती तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलोय, असे म्हणत शरद पवारांनी लोकांची मने जिंकली.


उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासाठी शरद पवार तुळजापूरच्या मैदानात उतरले होते. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी, सारखं-सारखं बोलून माझा घसा बसला असल्याचे म्हटले. ''सारखं सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसो किंवा आणखी काही होवो, आज  देशासमोरची जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही आणि मी जागे झालो नाही तर अनेक  संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावे लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे  प्रधानमंत्री त्यांचे नक्की राजकारण, प्रशासन काय आहे? हे तुम्हाला सांगावं  या हेतूने मी आता उभा आहे, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपला घसा बसला असतानाही शरद पवारांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरुद्ध सभा घेतली. म्हणजे, अजित पवारांच्या सासरवाडीतील उमेदवाराचा पराभव करण्याचे आवाहन करत शरद पवारांनी तुळजापूरमधून थेट मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 


फिरुन फिरुन घसा बसला


देशाच्या  लोकसभेची निवडणूक आली. या निवडणुकीमध्ये जी काही स्थिती आहे देशाची ती  तुमच्यापुढे मांडावी या हेतूने आज मी या ठिकाणी आलो. गेले काही दिवस  महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात जायचा प्रयत्न माझा आहे. साताऱ्याला  गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक  जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, औरंगाबादला  गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा आहे. त्यामुळे एक गोष्ट झाली  की सारखं सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसो किंवा आणखी काही होवो, आज  देशासमोरची जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही आणि मी जागे झालो नाही तर अनेक  संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावे लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे  प्रधानमंत्री त्यांचे नक्की राजकारण, प्रशासन काय आहे? हे तुम्हाला सांगावं  या हेतूने मी आता उभा आहे.


अजित पवाराच्या नातेवाईक उमेदवार


धाराशिव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवारांच्या जवळच्या नातेवाईक मैदानात आहेत. अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव असून माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे अजित पवारांचे मेव्हणे आहेत. सुनेत्रा पवार यांचे भाऊ असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या सून येथून लोकसभेच्या उमेदवार आहेत. अजित पवारांचे जवळचे नातेवाईक उमेदवार असतानाही, आपला घसा बसला असतानाही शरद पवारांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये म्हणजेच, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. आपल्या सभेतून त्यांनी मोदी सरकावर व पाटील कुटुंबीयांवरही हल्लाबोल केला. 


पेट्रोल दर कमी करणार होते, आज काय झाले?


आपला देश हा सामान्य लोकांचा देश आहे.  लोकांच्या समोर काय संकट आहे? खेड्यापाड्यातील माणूस असो, शहरातील  मध्यमवर्गीय असो त्याला विचारलं की तुझ्या पुढची अडचण काय? पहिलं उत्तर  येतं, महागाईने त्रासून गेलोय. राज्यकर्ते कोण आहेत? आणि त्यांचे आश्वासन  काय होते? हे राज्यकर्ते 2014 साली सत्तेवर आले. 2014 ला मत मागत असताना  मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलचे दर 50 टक्क्यांनी 50 दिवसांमध्ये मी  कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते 71  रुपये ते 71 रुपये दर लिटरचे 50 दिवसांत कमी करणार होते. आज 3 हजार 650  दिवस झाले, पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला 106  रुपये झाला. म्हणजे होता 71, 50 टक्के कमी करण्याचा आश्वासन आणि आता 106 करून टाकले. पेट्रोल वाढला तर प्रवास महागात पडतो, पेट्रोल वाढलं तर  शेतकऱ्यांच्या शेतीचा माल विकायला न्यायचा म्हटलं तर त्याचा बोजा वाढतो. महागाईची ही झळ सामान्य माणसाला अधिक सोसावी लागते, असे शरद पवारांनी म्हटले.  


भारतात 100 पैकी 87 मुले बेरोजगार


या  देशामध्ये तरुण लोक आहेत आणि त्यांच्या समोरचा सर्वांत मोठा प्रश्न कोणता  असेल तर तो बेकारीचा प्रश्न. बेकारीबद्दलची काय स्थिती? जगामध्ये एक संघटना  आहे तिचं नाव आय. एल. ओ. (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) वेगवेगळ्या  तरुणांच्या आणि संपूर्ण जगातला ते अभ्यास करतात. त्यांनी असा अहवाल दिला की  हिंदुस्थानामध्ये 100 मुलं जर घेतली तर त्यातील 87 मुलं हे बेकार आहेत. 87  टक्के तरुणांमध्ये आज बेकारी आहे आणि त्यांना 100 टक्के रोजगार द्यायचा शब्द मोदी साहेबांनी दिला होता, त्यात काही त्यांनी केलं नाही. मग केलं काय  त्यांनी?, असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.