मुंबई: दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं.  नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या (MNS) रिअॅक्शनला प्रत्युत्तर दिले. 


यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मनसे पक्षाचा थेट उल्लेख टाळला. मात्र, दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी काही नेत्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन ते तीन प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना अहमदशहा अब्दालीने कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली आहे. त्यापैकीच एक सुपारी शनिवारी ठाण्यात वाजवली गेली. मर्दाची अवलाद असाल, तर समोरून हल्ला केला असता. तुम्हाला विनंती आहे की, पुन्हा काळोखात लपुनछपून असे हल्ले करु नका, समोरून हल्ले करा. तुमच्या घरातही आईवडील, मुलबाळं , तुमची पत्नी हे सगळं पाहत असेल. पण अशा घटनांनी आम्हाला फरक पडत नाही. आमचा ठाण्यातील कार्यक्रम उत्तम झाला. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी उत्तमप्रकारे सुरु आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.


यावेळी संजय राऊत यांनी मनसेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ला म्हणजे अॅक्शनला रिअॅक्शन होती, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की, दोन महिने थांबा, तुम्हाला अॅक्शन-रिअॅक्शन काय असते, ते दाखवू. सत्तेची एवढी मस्ती दाखवू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.


अमित शाह आणि राज ठाकरेंवर सडकून टीका


गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून भाजप नेते अमित शाह यांचा उल्लेख सातत्याने अहमदशाह अब्दाली असा केला जात आहे. तर राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणून ठाकरे गटाकडून हिणवले जात आहे. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत या दोन्ही नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. अमित शाह यांच्याच इशाऱ्यावर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष चालत आहे, असे अधोरेखित करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर फेकण्यात आलेल्या सुपाऱ्यांशी आपल्या पक्षाचा संबंध नसल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर सर्व पक्षांमधील मराठा कार्यकर्ते आणि आंदोलक एकत्र आले आहेत. त्यामधूनच बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्याचा प्रकार घडला होता, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


ठाण्यात जो प्रकार घडला तेथील लोक दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीचे लोक होते. महाराष्ट्रात गोंधळ करण्यासाठी त्यांना सुपारी देण्यात आली होती, ती सुपारी ठाण्यात वाजली. अहमदशहा अब्दाली सुपाऱ्या देऊन दिल्लीतून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या गोंधळाची मजा पाहत बसलाय. विधानसभा निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडणारच. मी इकडे कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. कारण जे काही चाललंय ते दिल्लीतून अहमदशाह अब्दालीने दिलेल्या सुपारीवरुन चाललंय. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना काही कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. त्यानुसार हे नेते काम करत आहेत, असे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.


VIDEO: संजय राऊतांचा मनसेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल



आणखी वाचा


उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहेत; भाजप प्रदेशाध्यक्षांचा घणाघात, म्हणाले...