सिंधुदुर्ग: महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी कल्याण, ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या चार मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या चारही मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र, आता या मतदारसंघांवर भाजपकडून दावा सांगितला जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. यापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Loksabha) मतदारसंघाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. 


या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे किरण सामंत (Kiran Samant) आणि भाजपचे नारायण राणे (Narayan Rane) इच्छूक आहेत. मंगळवारी रात्री किरण सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या मतदारसंघावरील आपला दावा सोडला होता. मात्र, सकाळ उजाडेपर्यंत किरण सामंत यांची भूमिका पुन्हा बदलली होती. त्यांनी रात्री टाकलेली सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली होती. तसेच किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत यांनीही आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केले होते. 


या सगळ्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन सुरु असलेला वाद आणखीनच चिघळला होता. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री किरण सामंत यांनी ज्यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती त्यादरम्यान नारायण राणे आणि उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याचे सांगितले जाते.


मंगळवारी उत्तररात्री दीड ते दोनच्या सुमारास हे दोन्ही नेते एकमेकांना गुप्तपणे भेटले. उदय सामंत हे मंगळवारी नागपूरमध्ये होते. परंतु, नारायण राणे यांना भेटण्यासाठी ते मध्यरात्रीनंतर सिंधुदुर्गात दाखल झाले. याठिकाणी उदय सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर उदय सामंत हे मुंबईला रवाना झाले होते. तसेच उदय सामंत यांनी मंगळवारी सिंधुदुर्गात झालेल्या महायुतीच्या बैठकीलाही दांडी मारली होती. मात्र, आता नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान नेमकं  काय घडलं, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 


किरण सामंतांनी भावनेच्या भरात ते ट्विट केले होते, उदय सामंतांचा यू-टर्न


किरण सामंत यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट करुन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच सामंत बंधुंनी या भूमिकेवरुन घुमजाव केले होते. याविषयी बोलताना उदय सामंत यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती.त्यांनी म्हटले होते की, किरण सामंत हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत, ते भावनिक आहेत, एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी माघार घेण्याची पोस्ट केली होती, मात्र यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच मतदारांची भावना, जनभावना लक्षात घेऊन किरण सामंत यांच्याजवळ आपण बोललो आहोत. शिवसेनेकडून आमच्याकडून एकच इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे आजही आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा कायम असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा


रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच मात्र मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार घेतली: उदय सामंत