Rajya sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) अर्ज भरण्याची गुरुवारी (दि.15) शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे. 


महायुतीच्या उमेदवारांची घोषणा 


राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी भाजप आणि शिंदे गटाकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदे गटाकडून काँग्रेसमधून नुकतेच आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत एकूण चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे भाजपने अशोक चव्हाण यांच्या रुपाने बाहेरुन आलेल्या नेत्याला लगेच राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत आणि सामान्य केडरमध्ये नाराजी पसरण्याचा धोका होता. परंतु, त्याचवेळी मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या निष्ठावंतांना संधी देऊन भाजप नेतृत्त्वाने एकप्रकारे बॅलन्स साधला आहे. 


महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर 


भाजपचे उमेदवार - अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे


शिंदे गटाचे उमेदवार  - मिलिंद देवरा


अजित पवार गट - प्रफुल्ल पटेल 


काँग्रेसचाही उमेदवार जाहीर 
 


काँग्रेसकडून (Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडूनही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीये. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचे नाव आहे. काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.


भाजपने चौथा उमेदवार दिला नसल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता


महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुक होणार आहे. या सहा जागांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेच्या रुपाने फळ मिळालं आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मंगळवारी (दि.13) अडीच तास चर्चा झाली. मतं मिळवणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने चौथा उमेदवार देणे टाळलंय. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांना पाडलं पाहिजे; पक्ष आणि चिन्ह मिळताच अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना थेट कानमंत्र!