मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नव्या विरोधी पक्ष नेत्याची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.  शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर  सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या कॉंग्रेसकडे संख्याबळ सर्वाधिक असल्याने विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेणार आहेत.


महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होऊन चार दिवस झाले तरी विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम असल्याने आता तातडीने निर्णयाची शक्यता आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक आहे.   त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या  44 जागा असलेला काँग्रेस पक्ष हाच सर्वाधिक संख्या असलेला विरोधी पक्ष आहे.  विरोधी पक्षनेता हा विरोधी बाकावरच्या सर्व पक्षांचं प्रतिनिधित्व करत असतो. देशाच्या संसदेत एकूण संख्याबळाच्या एकदशांश तरी संख्या पूर्ण करणारे पक्ष या पदावर दावा करु शकतात अशी अट आहे. त्यात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला हे पद मिळतं. 


विरोधी पक्षनेतेपदासाठीचे काँग्रेसमधले दावेदार?


काँग्रेसमध्ये नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा आहे. 


 नाना पटोले हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या बदलांची चर्चा थंडावलेली असतानाच आता या नव्या पदावर त्यांची वर्णी लागणार का हा प्रश्नच आहे. एक व्यक्ती, एक पद हा काँग्रेसच्या उदयपूर शिबिरातला नियमही आहे. संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असताना शेवटच्या क्षणी हुकलेलं होतं. त्यामुळे आता या संधीसाठी आपला विचार व्हावा यासाठी त्यांनी अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.  दुसरीकडे विरोधी पक्षनेता देताना ज्येष्ठांचा विचार होणार का तरुण नेतृत्वाला काँग्रेस संधी देणार हेही पाहावं लागेल. 


महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन  4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होतआहे. विरोधक कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार.... सरकारकडून उत्तरे कशी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय 


हे ही वाचा :