Nitesh Rane Controversial Statement: मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना सडेतोड उत्तरं देत आहेत. पण, अशातच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीकेची तोफ डागली जात आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 


भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले आहेत. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना त्यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनंही नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नितेश राणेंना खतपाणी घालून जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजपनं केल्याचं ठाकरेंच्या शिवनसेनेचे नेते शरद कोळी म्हणाले आहेत. 


काय म्हणालेले नितेश राणे? 


फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना नितेश राणे खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांसोबतच त्यांच्या मित्रपक्षांकडूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 


एकीकडे नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर दुसरीकडे त्यांच्याच मित्रपक्षाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप


एकीकडे नितेश राणे मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका असं सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच महायुतीतल्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं आहे. यामिनी जाधव या शिंदेंच्या शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार आहेत. या संदर्भातला एक बॅनर मुंबईतल्या भायखळा भागात लावण्यात आला होता. हा बॅनर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केलं का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला अचानक मुस्लिमांची आठवण कशी झाली? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. भाजपनंही यामिनी जाधवांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. 


दरम्यान, व्यवहार करताना फक्त हिंदुंशीच करा, असं म्हणत नितेश राणेंनी गरळ ओकली आहे. आणि त्यावरून आता राजकीय आरोप सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी बुरख्यांचं वाटप केलं आहे. तर तिसरीकडे ठाकरे गट यंदा मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच सध्याचं राजकारण या ना, त्या कारणानं मुस्लिम विषयाभोवती फिरताना दिसतंय.