मुंबई : राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना, मीरा भाईंदरमध्ये (Mira bhayandar) एका व्यापाऱ्यास झालेल्या मारहाणीनंतर मनसे आणि परप्रांतीय असा वाद पुन्हा समोर आला आहे. त्यातच, येथील व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर आता मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढून आपली मराठीजनांची ताकद दाखवून दिली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव (Avinash jadhav) यांना मध्यरात्रीच ताब्यात घेतलं होतं. 11 तासानंतर पोलिसांनी तुम्हाला सोडलं? काय झालं गेल्या अकरा तासात असा प्रश्न अविनाश जाधव यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी गेल्या 11 तासांत जे घडलं ते सांगेलच, पण मीरा भाईंदरमधील मराठी माणूस एकवटला, इथल्या आमदाराला त्यांनी दाखवून दिलं की मराठी टक्का कमी असला तरी एकवटला आहे, याचा आनंद असल्याचे मनसे (MNS) नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं. 

Continues below advertisement


पोलिसांनी आम्हाला उचललं, आमच्या जवळजवळ दीड ते 2 हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. खरंतर याची गरजच नव्हती, जर व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपुत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या रुटने नको, त्या रुटने मोर्चा काढा पण पोलीस माझ्याशी किंवा आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असं बोललेच नाहीत, पोलीस चुकीची माहिती देत आहेत, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले. आमच्या मोर्चाला सरकारकडूनच विरोध होता, स्थानिक आमदार गृहखात्याच्या दबावाखाली आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला, मीरा भाईंदरमध्ये गेल्या 7-8 तास जे चाललं ते महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिलं, असेही अविनाश जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 


माझ्या घरी सकाळी पोलीस आल्यानंतर माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की, मराठी माणसांचा हा मोर्चा आहे, अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जाताला, ह्या मोर्चाला विरोध करत आहात मग हे सरकारच्या विरोधात जाईल असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे. पोलिसांनी सकाळी 3 वाजता मला घरातून उठवलं, तिथून मीरा भाईंदरला नेलं, तिथून खंडणीच्या ऑफिसमध्ये नेलं, त्यानंतर 2 तासांनी मला पालघरच्या टोकाला नेलं, अशी माहितीही जाधव यांनी दिली. अनेक अधिकाऱ्यांवर दबाव होता, त्यांना हे करायचं नव्हतं. 



मी प्रताप सरनाईक यांची दिलगिरी व्यक्त करतो


प्रताप सरनाईकांनी सरकारच्याविरोधात जाऊन ते मराठी माणसाच्यासोबत होते, मी सकाळपासून त्यांचे स्टेटमेंट ऐकत आहे. जर एखादा मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठीशी असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, मी प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या घटनेचं आयोजक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही अविनाश जाधव यांनी म्हटलं.  


हेही वाचा