मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यापूर्वीच मनुस्मृतीच्या (Manusmriti) शालेय अभ्यासक्रमातील समावेशाविषयी नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे या मुद्द्यावरुन कमालीचे आक्रमक झाले आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत.


मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले आहे. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज 5000 वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 


आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती म्हणणारे मागच्या दाराने तीच व्यवस्था आणू पाहत आहेत: जितेंद्र आव्हाड


सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमच संविधान म्हणजेच मनुस्मृती, असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं, त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे.


जे लोक 1950 साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत.  तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा


मनुस्मृती आणि मनाचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याच्या चर्चा, शरद पवार म्हणाले, मुलांच्या डोक्यात काय घालायचं, पालकांनी विचार करावा