Jalna: राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि विधानसभा निवडणूका (Vidhansabha election) जवळ येत असल्याचा अंदाज आल्यानंतर राज्यातील राजकीय घटनांना वेग आला आहे. विधानसभेसाठी इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेताना दिसून येत असताना आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे.  


मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा आरक्षण आंदोलक लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरक्षण न मिळाल्याने महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे सांगत आहेत. दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून इच्छूकांसह अनेक नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत. आज सर्वाधिक बदली होणारे सनदी अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


गेवराई मतदारसंघातून इच्छूक?


सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन  मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत. गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं  बोलल जातेय ,  जरांगे पाटील आणि अशोक मुंडे यांच्यात 20 मिनिटे चर्चा  झाली. दरम्यान अशोक मुंडे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.


गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली होती. लोक महायुतीला कंटाळल्याचं बोललं जातंय. राज्यातील गोरगरिब  महायुतीला कंटाळल्याचं ते म्हणाले होते. आम्ही महाराष्ट्रात नवं समिकरण घडवून आणत असल्याचं ते म्हणाले होते.


..अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत.


"महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत. त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे. महायुती हटवली तर महाविकास आघडी येते. महाविकास आघाडी हटवली तर महायुती येते. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत  अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत," असं राजरत्न आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. 


राजरत्न आंबेडकर यांनी स्थापन केला नवा पक्ष


राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच राज्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आरपीआय नावाने नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे आता ते राजकीय समीकरण जुळवू पाहतायत. तर राजकारण माझा प्रदेश नाही. पण राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यामुळे आम्हाला राजकारणात उतरावे लागत आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.