मुंबई :  देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2024)  मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मनसे प्रमुख  राज ठाकरे यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी  महात्मा गांधींजींचे विचार सांगत राज्यातील  वाचाळवीरांना टोला लगवला आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे. 


राज ठाकरे आपल्या फेसबुकपोस्टमध्ये म्हणाले,  आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे.  त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची.  या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा.  गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर 75  वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. 






याशिवाय राज ठाकरे यांनी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण या दोन वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं, असे    राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  


हे ही वाचा :


Gandhi Jayanti 2024 Quotes: जीवनात मोठी शिकवण देतात गांधीजींचे 'हे' 10 विचार, प्रत्येकासाठी महत्त्वाचे, विविध अडचणींवर मिळेल समाधान