Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (9 ऑगस्ट) होणार आहे. एकूण 18 आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. अवघ्या काही मिनिटांवर भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदार शपथ घेतील. दरम्यान शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) नाराज असल्याचं कळतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रचंड खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या आमदारांनी बंडखोरीला मदत केली अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं आहे. यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा पत्ता जवळपास कट झाल्याचं कळतं.


रात्रीच्या बैठकीत काय झालं?
संजय शिरसाट हे आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बंडखोरी करताना अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना मदत केली आहे. त्यामुळे शिरसाट यांना देखील मंत्रिपदाची अपेक्षा आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका वाटू लागली. त्यांचा पत्ता जवळपास कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "यावेळच्या विस्तारात तुमचं नाव नसेल. मात्र पुढच्या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात तुमचं नाव निश्चित असेल. सध्या तरी तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही," असे स्पष्ट संकेत संजय शिरसाट यांना देण्यात आले. त्यामुळे संजय शिरसाट अतिशय नाराज होते. 


शिंदे गटाकडून अंतिम यादीतील नावं आणि पुन्हा चर्चा सुरु असलेल्यांची नावं
मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटाकडून काही नावं अंतिम झाली आहेत तर काही नावांवर अद्याप चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मंत्र्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एकूण नऊ मंत्री शपथ घेणार आहेत. जुन्या सर्व मंत्र्यांना पुन्हा नव्याने संधी देण्यात येईल. या या नावांमुळे काही नवे चेहरे नाराज असल्याचं कळतं. पाहूया शिंदे गटाच्या अंतिम यादीतील नावं आणि अद्याप चर्चा सुरु असलेल्यांची नावं.  


अंतिम यादी
उदय सामंत 
गुलाबराव पाटील 
दादा भुसे 
संभुराजे देसाई 
संदीपन भुमरे 
तानाजी सावंत 
दीपक केसरकर 


चर्चा सुरु असलेली नावं
अब्दुल सत्तार
संजय राठोड 
भरत गोगावले
संजय शिरसाट


महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती. 


भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ


1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरीश महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
9) विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)