Maharashtra Cabinet Expansion : "उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही, अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं", अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. या शपथविधी सोहळ्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.


जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 आमदार शपथबद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात टीईटी घोटाळ्यात नाव आलेले अब्दुल सत्तार आणि भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपदाचा मान मिळाला. यावरुनच अजित पवार यांनी भाष्य केलं.


...ते टाळलं असतं तर बरं झालं असतं : अजित पवार
या शपथविधी सोहळ्या विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार उपस्थित होते. या सोहळा पार पडल्यानंतर राजभवनातून बाहेर पडल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना अजित पवार  म्हणाले की, "उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता लवकरात लवकर महाराष्ट्रातले प्रश्न सोडवावेत, खूप समस्या आहेत, पावसाच्या वगैरे. खूप जणांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, ते सोडवावेत. पण एक झालेलं आहे, साधारण ज्यांच्याबद्दल अजून बोललं जातं, ज्यांना अजून क्लीन चिट मिळालेली नाही, अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं.  


18 आमदार शपथबद्ध
राज्याला अखेर कारभारी मिळाले आहेत.जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.  


भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान  भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.


या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.


शिंदे गटातील मंत्री 


गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)


भाजपतील मंत्री


राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)


शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये



  • आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली, तर शिंदे गटातून पहिल्यांदा शपथ घेण्याचा मान गुलाबराव पाटील यांना मिळाला

  • विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. 'पुरुषप्रधान मंत्रिमंडळ' असा उल्लेख शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा करता येईल.

  • तर शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला असून मागे पडलेलं अब्दुल सत्तारांचं नाव ऐनवेळी आघाडीवर आलं.

  • भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना पुन्हा मंत्रिपदाचा मान


 


Maharashtra Cabinet Expansion : मी शपथ घेतो की... 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री


Maharashtra Cabinet Expansion : 'पुरुषप्रधान' मंत्रिमंडळ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही