Maharashtra Cabinet Expansion:

  गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात काही तास चर्चा झाली. ही चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती. त्यानंतर आता उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.


कोणत्या आमदारांची लागेल मंत्रीपदी वर्णी?


शिंदे सरकाराच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, राजेंद्र यड्राव्हकर, संजय राठोड यांची यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. यात अब्दुल सत्तार यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींचे नाव समोर आल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार की, नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांच्यसह काही नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देऊ शकते.


दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) बुधवार, 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून याबाबत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, 9 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार  9 ऑगस्ट ते गुरुवार, 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! तारीख अन् वेळ निश्चित, राजभवनावर शपथविधी
Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले...
मुख्यमंत्री आज नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; दोन्ही जिल्ह्यात पावसाचा कहर मात्र दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर?