कोल्हापूर : येत्या 14 मे रोजी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याआधी या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाचे पेव फुटले आहे. या जागेवर महायुतीकडून संजय मंडलिक उभे आहेत. तर महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलीय. दरम्यान, महायुतीला कात्रीत पकडण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने राज्यसभेचा मुद्दा बाहेर काढला होता. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने (तेव्हाची अविभाजित शिवसेना) संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली नाही. मग आता का राजघराण्याचा पुळका आला, असा सवाल शिवसेनेचे उदय सामंत यांनी केला. यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाष्य केलं आहे. मी चुकलो असेन तर संभाजीराजे यांची माफी मागतो, असं ठाकरे म्हणाले आहेत. 


आमच्यातील ऋणानुबंध तुटलेले नाही


उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीचा उल्लेख करत विरोधकांवर सडकून टीका केली. संभाजीराजे आणि माझ्यातले ऋणानुबंध तुटलेले नाहीत. संभाजीराजेंना आजही विचारा की आमच्यात दुरावा आलेला आहे का? आमच्यात दुरावा आलेला असेल तर संभाजीराजे छत्रपतींनी सर्वांसमोर सांगावे, असे ठाकरे म्हणाले. 


...तर मी संभाजीराजेंची जाहीर माफी मागतो


उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारून संजय पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवले होते. यावर बोलाना राज्यसभेच्या निवडणुकीवेळी मला एक कुणकुण लागली होती. त्यावेळी त्यांनी (विरोधक) संजय पवार यांना पाडलं. संजय पवार यांच्या बाबत जे घडलं ते संभाजी राजेंसोबत घडलं असते तर ते पाप कोणाच्या माथी आले असते, असा सवाल ठाकरे यांनी केला. तसेच मी जर संभाजीराजे यांच्यासोबत चुकीचा वागलो असेल, तर त्यांची जाहीर माफी मागतो. पण संभाजीराजे यांच्याबद्दल मी चुकलो असेन, तर आज तुम्ही तीच चूक छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबतीत करणार आहात का? तुम्ही त्यांना पाडायला का उभे आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला.   


आम्ही शेण खाल्लं, मग तुम्हीही...


आम्ही त्यांची चूक दाखवल्यावर ते आमच्याकडेच बोट करतायत. आम्ही शेण खाल्लं असेल. पण तुम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही का शेण खाताय. शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे. या माणसाने मी कोणीतरी आहे, हे कधी जानवूच दिलं नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो होतो. मी वयाने लहान होतो. पण माझ्यासोबत ते फार आदराने वागले होते. हाच त्यांचा मोठेपणा आहे, अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.


उदय सामंत काय म्हणाले होते?


दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांना अनेक अटी घालण्यात आल्या होत्या. या अटींना मी विरोध केला. पण  संभाजीराजे यांच्याशी बोलणं चालू असतानाच ऐनवेळी संजय पावर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.संभाजीराजे यांनी अर्ज भरू नये यासाठी त्यांना अडकवून ठेवण्यात आलं होतं. त्यांना आता छत्रपती घराण्याचा पुळका येत आहे. राज्यसभेला संभाजीराजे यांना अपमानित केलं जात होतं, असा गंभीर आरोप उदयम सामंत यांनी केला. 1 मे रोजी उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सामंत यांनी वरील आरोप केले होते.


हेही वाचा :


नरेंद्र मोदी देशासमोर संकट, असा असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधी पाहिला नाही; शरद पवारांचा प्रहार


सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार, एक काका, दुसरे दादा...; राऊतांचा निवडणूक आयोगावरही घणाघात