Jayant Patil on Devendra Fadnavis, Pune : पुण्यात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. दरम्यान,  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या हल्ल्यावरुन चिंता व्यक्त केलीये. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, कायदा व सुव्यवस्थेच्या धज्ज्या उडाल्या आहेत, असंही पाटील म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, "गेल्या काही दिवसांत समोर असलेल्या घटनेवरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा", अशी मागणी केली असल्याचे पत्रकाराने सांगितले. यावर बोलताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मिश्किल टोला लगावलाय. 



जयंत पाटील काय काय म्हणाले?


जयंत पाटील म्हणाले, असं आहे की, आता दोन महिनेच राहिलेले आहेत. 2 महिन्यांसाठी  देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही. या सरकार टोटल अपयशी आहे. एका व्यक्तीला मी दोष देणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण सरकार फेल गेलं आहे. महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही. बालकांचं संरक्षण करु शकत नाहीत. आता पोलिसांचंही संरक्षण करण्याची समस्या तयार झालेली आहे. पोलिसांवरही हल्ले होऊ लागले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांचा मोरल लो करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. 


गुन्हेगारांचा फोटो राजकारण्यांसोबत दिसू लागणे हे फार गंभीर आहे


पुढे बोलताना पाटील म्हणाले, सर्वच पोलिसांच्या बदल्या जर आर्थिक व्यवहार होऊन केल्या जात असतील, तर मग नैतिकता किती राहिली? हा महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांसंबंधीचा प्रश्न जनतेला पडू लागलाय. गुन्हेगारांचा फोटो राजकारण्यांसोबत दिसू लागणे हे फार गंभीर आहे, पण कधी कधी अपघातानं पण होऊ शकतं. मी त्याला दोष देणार नाही. जर वारंवार असं होत असेल तर आणि राजकारणी जर गुन्हेगाराला घेऊन फिरत असेल तर ते गंभीर आहे. पोलिसांवर हल्ले होऊ लागलेत, त्यामुळे पोलीस दुबळा झालाय का? असाही प्रश्न निर्माण झालाय, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. 


पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गृहखात्याचा भोंगळ कारभार आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा मॉरल लो झालेला आहे. गुन्हेगारच प्रबळ होईला लागले आहेत, याचा आज पुण्यात अनुभव आला.  महाराष्ट्र पोलीस दलाब मागे सरकारने ठाम उभा राहिलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही.  पुण्यातील पोलीस व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे दिसून येत आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jayant Patil : पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला, जयंत पाटील म्हणाले, गृहखात्याचा भोंगळ कारभार; गुन्हेगारच प्रबळ झालेत