Shivsena on Iqbal Singh Chahal, Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर सरकारकडून प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयएएस अधिकारी इक्बालसिंह चहल यांच्या बदलीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपने इक्बालसिंह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याच इक्बालसिंह चहल यांच्यावर सरकारने गृहखात्यात मोठी जबाबदारी दिल्याची टीका शिवसेना ठाकरे गटानं केलीय.


महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लहान मुलींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले आहेत. कोल्हापूर आणि बदलापुरात चिमुरड्यांचे लैगिंक शोषण झाल्यामुळे संपू्र्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनेही 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे महायुती सरकारला चारीबाजूंनी घेरण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने इक्बालसिंह चहल यांच्यावर गृह खात्यात मोठी जबाबदारी सोपवली आहे. 


इक्बालसिंह चहल यांच्यावर गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले IAS इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली झाली आहे. इक्बालसिंह चहल यांना आता गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. चहल यांच्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार होता. त्यांची बदली होऊन आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील.


इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्यानंतर  विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. आयएएस अधिकारी इक्बाल सिंग चहल यांच्यावरील आरोपांची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, कोविड काळात भाजप विरोधी पक्षात होता आणि इक्बाल सिंग चहल बीएमसी आयुक्त होते. तेव्हा भाजपने चहल यांच्यावर कोविड घोटाळा, फर्निचर घोटाळ्याचे आरोप केले. आज सत्तेत असताना त्याच अधिकाऱ्याकडे डोळेझाक केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यावर अनेक आरोपांची चौकशी सुरू आहे, अशा अधिकाऱ्याची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करणे कितपत योग्य आहे? असा सवालही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Vidhansabha Eletion : विधानसभा निवडणुकीत मविआला 150 ते 160 जागा, महायुतीला 120 ते 130 जागांचा अंदाज; 'मुड ऑफ नेशन' सर्व्हे समोर