Amit Shah Interview: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. "भाजपनं (BJP) बहुमताचा आकडा गाठला नाही तर भाजपकडे काही प्लान बी आहे का?" या प्रश्नावर अमित शहांनी थेट उत्तर दिलं आहे. "प्लान बी तेव्हाच बनवावा लागेल, ज्यावेळी प्लान A यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असेल, पण मला खात्री आहे की, पंतप्रधान मोदी (PM Modi) प्रचंड बहुमतानं सत्तेवर येतील...", असं अमित शहा म्हणाले. 


तुम्हाला लोक राजकीय चाणाक्य म्हणतात... या प्रश्नावरही अमित शहांनी उत्तर दिलं आहे. राजकीय चाणक्य म्हटल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी चाणाक्य नाही. हे फक्त लोक म्हणतात. माझा त्यावर विश्वास नाही." तसेच, पुढे बोलताना, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.


अरविंद केजरीवाल जिथे जातील, तिथे लोकांना दारूचा घोटाळा आठवेल : अमित शहा 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "मतदार म्हणून मला विश्वास आहे की, ते जिथे जातील तिथे लोकांना दारूचा घोटाळा आठवेल. अनेकांना मोठी बाटली दिसेल." अरविंद केजरीवाल यांच्या "तुम्ही मला मत दिलं तर मला तुरुंगात जावं लागणार नाही" या वक्तव्यावर ते म्हणाले की, "यापेक्षा मोठा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालय (निवडणुकीच्या) विजय-पराजयावर निर्णय देईल का?"


संविधानात बदलांसंदर्भातील चर्चांवर काय म्हणाले अमित शहा? 


भाजपचा 400 पारचा नारा आणि संविधानात बदल करण्यासंदर्भातील चर्चांवरही अमित शहांनी यावेळी भाष्य केलं. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, "आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून संविधान बदलण्यासाठी बहुमत आहे. पण आम्ही असं कधीच केलेलं नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास माझ्या पक्षाचा नाही. बहुमताचा दुरुपयोग केल्याचा इतिहास इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला होता. परंतु, हा... आम्हाला 400 जागा जिंकायच्यात, कारण आम्हाला देशाच्या राजकारणात स्थैर्य आणायचं आहे. कारण आम्हाला देशाच्या सीमा सुरक्षित करायच्या आहेत. आम्हाला यूसीसी आणायचं आहे. आम्ही 10 वर्षांत आम्ही जिंकलेल्या जागांचा उपयोग कसा केला? कलम 370 रद्द करणं, तिहेरी तलाक रद्द करणं आणि राम मंदिर उभारण्यासाठी केलाय." 


पाहा व्हिडीओ : Amit Shaha on India Alliance : विरोधकांना देशात अस्थिर सरकार हवं आहे, अमित शाहांची टीका