Manish Tewari On Inflation: लोकसभेत काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे घेतल्यानंतर महागाईवर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी महागाईवर चर्चा सुरू केली. ते म्हणाले की, देशातील महागाई दर गेल्या 14 महिन्यांपासून दुहेरी अंकात गेला आहे. हा गेल्या 30 वर्षांतील उच्चांक आहे. तांदूळ, दही, पनीर आणि पेन्सिल आणि शार्पनरसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी वाढला आहे. सरकारने मुलांनाही सोडले नाही.''


मनीष तिवारी म्हणाले की, सरकारने आपल्या बजेटमध्ये सुधारणा केली असेल, पण त्यामुळे देशभरातील घरांचे बजेट बिघडले आहे. आजची अर्थव्यवस्था ही आठ वर्षांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा परिणाम आहे. सरकार आपली तिजोरी भरत असून जनतेचा खिसा रिकामा करत आहे, असे ते म्हणाले.


महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलन

 



महागाईवर चर्चेपूर्वी काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन आज मागे घेण्यात आले. सभागृहात निषेध करण्यासाठी फलक घेऊन गेलेल्या काँग्रेस सदस्यांना मागील सोमवारी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. महागाईच्या मुद्द्यावर या खासदारांनी आंदोलन केले होते. या खासदारांचे निलंबन मागे घेतल्यानंतर दोन्ही पक्ष महागाईवर चर्चा करण्यास तयार झाले आहे.

 






सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब झाले 







यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "मी सभागृहातील सर्व पक्षांना विनंती करेन की, फलक सभागृहात आणू नयेत. जर खासदारांनी फलक आणले, तर मी सरकार किंवा विरोधकांचे ऐकणार नाही. यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मी त्यांना शेवटची संधी देत ​​आहे." सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा होईल, असे आश्वासन सरकारने विरोधकांना दिले होते. मात्र आज विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसातून दोनदा तहकूब करावे लागले, मात्र नंतर महागाईवर चर्चा झाली.