Dilip Walse Patil, मंचर : "विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) लागणार आहे. विधानसभेची निवडणूक आम्हाला मोठ्या ताकतीने आणि हिंमतीने लढवायची आहे. जिंकायचे पण आहे आणि ते आपण जिंकणारच आहोत. काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवत आहेत की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत, तर त्यांची कन्या लढवणार आहे. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले. ते मंचर येथील सभेत बोलत होते. 


तुम्ही मला सांभाळलं आमदार म्हणून मला विधानसभेला पाठवलं


दिलीप वळसे पाटील म्हणाले, मागील 30-35 वर्ष तुम्ही मला पाठिंबा दिला. तुम्ही मला सांभाळलं आमदार म्हणून मला विधानसभेला पाठवलं.  आपण अनेक शेतीचे प्रश्न मार्गी लावले. काही पाण्याचे प्रश्न सोडवले. प्रश्न जरूर शिल्लक राहिले आहेत. विजेचे देखील प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. पुढचे पाच वर्ष मी आता रात्रंदिवस काम करणार आहोत. आपली कामं पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भाने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने आपण सर्वांनी मदत करा. अनेक लोक बदनामी करतात, खोटनाटं सांगतात. काहीना काही बोलतात. मात्र, त्यांच्या कोणत्याही बोलण्याला मी आज उत्तर देणार नाही. वेळ आल्यावर मी त्या संदर्भात उत्तर देईल आणि वस्तुस्थिती सांगेन, असंही वळसे पाटील यांनी नमूद केलं. 


गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले


पुढे बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, एक वर्षापूर्वी राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या, त्यामधून आपण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील झालो. गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले. मी डिटेलमध्ये जात नाही, अजितदादा त्यावर बोलतील. त्या निर्णयांचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि इतर दोन पक्षांनी चांगलं काम करुन दाखवलं. काल पुण्यात लाडक्या बहीणचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले. त्याचा आपल्या सर्व महिलांमध्ये आनंद आहे. सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. मुलींच्या तांत्रिक शिक्षणामध्ये आपण पूर्वी 50 टक्के सवलत देतो होतो आता आपण 100 टक्के सवलत देणार आहोत. अनेक ऊस उत्पादक, दूध उत्पादक आहेत, ज्यावेळी दुधाचे भाव पडले त्यावेळी अजितदादांनी पुढाकार घेतला. लीटरमागे 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर दोन तीन वेळेला चक्री वादळ आली अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आपण त्यांनाही मदत केली. हिरड्याच्या पिकाला स्पेशल केस म्हणून 15 कोटी रुपये दिले. आज मला जास्त बोलायचं नाही. फक्त मी एवढचं सांगतो, गेल्या 30 ते 35 वर्षात तुम्ही मला पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला. महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. आपण अनेक शेतीचे प्रश्न सोडवले. काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत. मंचरचे आरोग्य केंद्र पुणे आणि मुंबईच्या तोडीचं उपरुग्णालय आहे. त्यामध्ये डायलिसीसपासून अनेक सुविधा उपलब्ध आहेत, असंही वळसे पाटील यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात, जाहीर पाठिंबा