मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या मागण्यावरुन विविध समाजाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून सरकारकडूनही त्यांना आश्वासन दिलं जात आहे. एकीकडे मराठा (Maratha) समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. तर, धनगर (Dhangar) समाजबांधवांकडूनही राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, धनगर व धनगड एकच आहे, असे सांगत आंदोलन करण्यात येत आहे. आता, धनगर समाजाचे आमदार गोपीचंद पडळकर (Popichand Padalkar) यांनी धनगर आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे. आचारसंहितेपूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात जीआर निघेल, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. तसेच, यावेळी, विरोधकांवर सडकून टीकाही त्यांनी केली. 


आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्हाला आशा असून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. आजवर धनगर समाजाला कायम फसवण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून झाले होते, आता पहिल्यांदाच कुठेतरी धनगरांना न्याय मिळायची वेळ आल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर व धनगड हे दोन्ही एक असल्याचा जीआर काढायची तयारी दर्शवली आहे. याशिवाय धनगर समाजाच्या इतर प्रमुख मागण्याही त्यांनी मान्य करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये शिंदे समितीला कर्नाटक व गोवा या दोन राज्यातून जी काय माहिती मिळणार आहे, ती गोळा करावी लागल्यास परवानगी दिली जाणार आहे. तसेच, इतर पाच राज्यात गोळा केलेली माहिती शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पडळकर यांनी दिली. 


अनुसूचित जमातीमध्ये समावेश


सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एका खिलारे नावाच्या धनगर कुटुंबाने पूर्वी धनगड म्हणून जे दाखले घेतले होते ते दाखले रद्द करण्याबाबतही निर्णय झाल्याने आता मुख्यमंत्र्यांकडून अधिसूचना निघाल्यास समाजातील सर्वांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यास सुरुवात होईल, असा विश्वास देखील गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. यापुढे फारच थोडे दिवस राहिले असल्याने आम्ही आता मुंबईतच ठाण मांडून बसणार असून तातडीने सचिवांसोबतच्या बैठका, त्यांना लागणारी कागदपत्रे देऊन जीआरचा प्रश्न मार्गी लावणार, असेही पडळकर यांनी म्हटले.


पडळकरांचा जरांगेंना टोला


दरम्यान, यापूर्वी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणतेही काम त्या सरकारने केले नव्हते. धनगर समाजाचं र आणि ड या दोन्हीही गोष्टी या विरोधकांना माहीत नसून त्यांना फक्त धनगर समाजाची मते हवी आहेत. त्यामुळेच धनगरांच्या आरक्षणाच्या बाबतीत कायम चुकीची भूमिका घेत असल्याचा टोला पडळकर यांनी विरोधकांना लगावला. तसेच, शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मी पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झाल्याचे वक्तव्य केल्याचा खुलासाही त्यांनी केला. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे जे खोटे स्वप्न दाखवले आहे, त्याचाच त्यांनी विचार करावा धनगर आपल्या आरक्षणासाठी सक्षम असून आता कोणीही वेडा राहिलेला नाही, असा टोलाही पडळकर यांनी जरांगेंना लगावला.


हेही वाचा


साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती