मुंबई: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कोहिनूर निवडला आहे. DCM चा अर्थ डबल सीएम. महाराष्ट्र हा देशाची आन-बाण-शान आहे त्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाते, असे वक्तव्य जैन मुनी आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केले. ते सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.


दक्षिण मुंबईतील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी एका जैन मंदिरात छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी आचार्य नयपद्मसागरजी महाराज  यांना मुंबईतील जैन बांधवांना महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आहे तर भारत आहे. महाराष्ट्रात आर्थिक राजधानी आहे. कोणताच उद्योगधंदा कुठे गेला नाही. गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आले, असे त्यांनी म्हटले. 'धूप मैं तपना मंजूर है... पर नरेंद्र मोदीजी को एक वोट कम गिरना मंजूर नही', असे वक्तव्यही त्यांनी केले.


देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट घेतला आहे. फडणवीस महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत कोणी महाराष्ट्राच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. फडणवीस यांनी ज्यांना साथ दिली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी म्हटले. 


मुंबईतील 2.5 लाख जैन मतं एकगठ्ठा महायुतीला टाकण्याचं जैन मुनींकडून आवाहन


दक्षिण मुंबईमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना जिंकून आणण्यासाठी कामाला लागलेली आहे. या मोहीमेतंर्गत सोमवारी विशेष संपर्क अभियान जैन मंदिरात  पार पडले. या अभियानाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित आहेत. दक्षिण मुंबईतील जैन मतदार महायुतीकडे वळवण्यासाठी विशेष संपर्क अभियान आज राबवले जात आहे.


आधी जैन समाजाला शिव्या दिल्या, पण ताकद कळाल्यावर वांद्र्यावरुन येऊन दर्शन घेतलं; फडणवीसांचा टोला


या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोले लगावले. माझ्या एनर्जीचा स्रोत नयपद्मसागरजी यांचा आशीर्वाद आहे. मुंबईत ज्यांनी जैन समाजाला शिव्या दिल्या, त्यांना जैन समाजाची ताकत कळाल्यानंतर वांद्र्यावरुन येऊन गुरुजींचं दर्शन घेतलंय. मुंबईत जैन समाज जर मतं देण्यासाठी आले, तर आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.


महाराज हा राष्ट्राला प्रेरणा देतो. देशात सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. मोदींच्या ध्येयाला पुढं नेण्यासाठी सारे एकत्र आले पाहिजेत. उध्दव ठाकरे ज्या पेपरला मुलाखत देतात तो पेपर कोणीही वाचत नाही. ठरलेली लोक मुलाखत घेतात. आम्ही त्याच्याकडे बघतही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


आपले मोदीजी फक्त भारताचे नव्हे, तर शंभर देशाचे नेते आहेत : देवेंद्र फडणवीस