Devendra Fadnavis on Ramdas Kadam : चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या मंत्रि‍पदाचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा घ्यायला हवा, असा म्हणत शिंदे गटाचे नेते (Shiv Sena Shinde Group) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर (BJP) निशाणा साधला होता. तसेच भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असेही रामदास कदमांनी म्हटले. आता रामदास कदम यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आम्हीही माणसं आहोत, आमचीही मनं दुखावतात. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकारचे आरोप करणे हे कुठल्या युती धर्मात बसते. त्यामुळे जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असे मला वाटते. तरी मी भाईंचे काय म्हणणे आहे हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  


मी एकनाथ शिंदेंशी बोलणार!


तर रामदास कदम यांनी भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असेही म्हटले. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रामदास भाई असे वारंवार टोकाचे बोलतात. त्याने आमचे मनं देखील दुखावले जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. 50 गोष्टी आम्हालाही त्याच्या उत्तरावर बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. याबाबत मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलेल, असे उत्तर त्यांनी रामदास कदम यांच्या टीकेवर दिले आहे. 


नेमकं काय म्हणाले होते रामदास कदम? 


रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण  का होत नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. तर भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी. तुमचं तुम्ही लढा आमचं आम्ही लढतो. प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला होता.


आणखी वाचा 


... त्याक्षणी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, जरांगेंबाबतच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका