Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. काल रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, या प्रकरणामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपल्याचं चित्र आहे, या प्रकरणानंतर काल (शनिवारी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्या त्या पोस्टवर आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.


बाबा सिद्दिकी प्रकरणावर शरद पवारांच्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार साहेबांना या वयात सत्ता पाहिजे आहे. एवढी गंभीर घटना झाली असून सुद्धा त्यांना खुर्ची पाहिजे. आम्हाला महाराष्ट्र टिकवायचे आहे सावरायचे आहे त्यांना खुर्ची पाहिजे त्यांनी खुर्चीचा पाहाव आम्हाला महाराष्ट्र वाचवायचे आम्ही महाराष्ट्र पाहतो असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. 


ही अतिशय दुखद आणि गंभीर प्रकारची घटना आहे, बाबा सिद्दिकी यांच्याशी माझी निकटची मैत्री होती. अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलं. त्यामुळे या घडलेल्या घटनेने आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी पकडले गेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल देखील या प्रकरणात समोर आले आहेत, याबाबत आत्ता बोलणं उचित नाही. आरोपीच्या माहितीनंतर या प्रकरणातील माहिती समोर येईल. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, त्यांना फक्त सत्ता हवी आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्चा आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे, आम्हाला महाराष्ट्र पाहायचा आहे, राज्याचा विकास करायचा आहे. राज्याची सुरक्षा पाहायची आहे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहतायत, त्यांनी खुर्चीकडे पाहावं आणि हवं तो बोलावं, असं ही त्यांनी म्हटलं आहे. 


रेकी करण्यावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य


या प्रकरणात असे सर्व थिअरी चालवले जात आहे, ज्याला जे हवं ते ते चालवत आहेत. आरोपींची चौकशी सुरू आहे, त्याबाबची माहिती पोलिस सांगतील असंही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.


शरद पवार काय म्हणाले होते? 


राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पुढे बोलताना, या प्रकरणाची केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.