पंढरपूर: माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार (Sharad Pawar) यांना अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय अभिजित पाटील (Abhijit Patil) हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाकाव , सांगोला आणि अकलूज येथे तीन सभांचा धडाका उडवून देत असून रात्री सोलापूर येथे मुक्कामी असणार आहेत. याच ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . 


अभिजित पाटील भाजपसोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे याना मोठा फटका बसू शकतो . आज देवेंद्र फडणवीस हे अकलूज येथील मोहिते पाटील कुटुंबातील बडा चेहरा असलेल्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरी चहाला जाणार असून त्यांना भाजपच्या व्यासपीठावर आणणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत. अशातच अभिजित पाटील यांनाही फडणवीस यांनी गळाला  लावल्याने माढा  लोकसभा मतदारसंघात 30 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी फडणवीस हे डबल धमाका करणार आहेत . 


अभिजित पाटलांच्या भाजप प्रवेशामागील कारण काय?


दोन दिवसांपूर्वी राज्य सहकारी शिखर बँकेने अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व गोदामं सील करत  ताब्यात घेतली होती . या गोदामात जवळपास 1 लाखापेक्षा जास्त साखर पोत्यांचा साठा आहे . विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे बँकांचे 450 कोटी रुपये थकलेले असून यासाठी न्यायालयाची स्थगिती उठताच बँकेने कारखाना सील केला होता. सध्या शेतकऱ्यांची उसाची बिले द्यायची असून नियमानुसार हे सील काढायला किमान 25 टक्के रक्कम भरावी लागणार आहे . त्यासाठी 100 कोटी पेक्षा जास्त रकमेची आवश्यकता असून सध्या कारखान्याकडे पैसेच नसल्याने जप्तीची कारवाई मधून सुटकेसाठी अभिजित पाटील यांच्यावर उघडपणे भाजपमध्ये येण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. 


इकडं अजितदादांना क्लीनचीट, तिकडं शरद पवारांच्या सभेत असतानाच अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई


शिखर बँकेची कारवाई सुरु असताना खुद्द शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे सभा घेत होते. अभिजित पाटील यांना याच सभेच्या ठिकाणी ही माहिती समजल्यावर ते तातडीने कारखान्यावर पोचले होते . मात्र, तोपर्यंत बँकेने जप्तीची कारवाई पूर्ण केली होती. यानंतर पाटील यांनी शरद पवार यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. मात्र, दुसरा मार्गच नसल्याने अभिजित पाटील यांना भाजपशी तडजोड करण्याची वेळ आली आहे . त्यातच कारखान्याचे संचालक आणि अभिजित पाटील गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कारखाना वाचणे गरजेचे असल्याने भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचेही माहिती आहे . त्यामुळेच शरद पवार यांच्याशी चर्चा करून अभिजित पाटील भाजप मध्ये जाण्याच्या मानसिकतेत आहेत . भाजपात गेल्यावर सरकारकडून कारखान्याला पॅकेज घेऊन विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची भूमिका पाटील यांची आहे. 


अभिजित पाटलांमुळे माढा आणि सोलापूरात भाजपची ताकद वाढणार


अभिजित पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी कर्जाच्या बोज्याखाली दाबून बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून कारखाना सुरु केला होता. गेल्यावर्षी साडे सात लाख आणि यावर्षी 10 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत पाटील यांनी कारखान्याला जीवदान दिले होते . मात्र, पूर्वीच्या कर्जामुळे आता अडचणीत आल्याने अभिजित पाटील यांनी आता भाजपमध्ये जाण्याची मानसिकता केली आहे . 


राष्ट्रवादी फुटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व बडे नेते शरद पवार यांना सोडून जात असताना अभिजित पाटील या तरुणाने जिल्ह्यात पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले दिवस आणले . सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय तरुण नेता अशी इमेज अभिजित पाटील यांनी बनविली असून जिल्ह्यातील तरुणांचा तो आयकॉन बनल्याने फडणवीस यांनी पाटील यांना गळाला लावले आहे . 


अभिजित पाटील यांची माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मोठी क्रेझ असून अडचणीत असलेल्या भाजपाला जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांचा मोठा फायदा होणार आहे . त्यामुळे भाजपत प्रवेश केल्यास कारखान्याच्या अडचणी दूर करण्याचा आणि राजकीय पुनर्वसनाचा शब्द फडणवीस देणार असल्याची माहिती आहे . याचा फटका मात्र महाविकास आघाडीला सोलापूर जिल्ह्यात बसणार असून कालपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा गाजवणारे अभिजित पाटील आता भाजपच्या स्टेजवर येणार का, याचा निर्णय आज रात्री होण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


माढा जिंकण्यासाठी आता PM मोदी मैदानात, मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात 28 एकरावर जंगी सभा, वारं फिरणार?