Eknath Shinde and Devendra Fadnavis : पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील महायुती सरकारमध्ये समन्वयाचा आभाव दिसून आला. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. महाराष्ट्रातही अनेक पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या व्हिसावर आले आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही बेपत्ता नाही, असे स्पष्ट केले होते. आता दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता अचूक आकडा लवकरच पोलीस विभाग घोषित करेल. पण, जे पाकिस्तानी नागरिक भारतात बाहेर गेले पाहिजे, अशा सगळ्या नागरिकांची ओळख पटली आहे. त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांना बाहेर जायला सांगण्यात आले आहे. पण केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणीही नागरिक असा नाही की, जो आम्हाला सापडला नाही, असे त्यांनी म्हटले.  

सगळ्यांची ओळख पटली 

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीत मोठा संभ्रम निर्माण झाला. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या आधारावर मंत्री बोलत असतात. त्यामुळेच मी आपल्यासमोर गृहमंत्री म्हणून माहिती दिली आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतो की, जे पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर जायला पाहिजे, अशा सगळ्यांची ओळख पटलेली आहे. 

पोलीस आकडेवारी लवकरच जाहीर करतील

महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना माझं सांगणं आहे की, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून चालते व्हा. पाकिस्तानी नागरिकांनी आमचा देश सोडून निघून जावं. अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवर ठोकतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही वेळा अनेक प्रकारच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केले जातात. पण मी सांगू इच्छितो की, जे पाकिस्तानी नागरिक केंद्र सरकारच्या आदेशानुसार देश सोडून जायला हवे, अशा सगळ्यांची ओळख पटलेली आहे. त्यांना भारताबाहेर पाठवण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. याबाबत आकडेवारी लवकरच पोलीस जाहीर करतील. संभ्रम यामुळे निर्माण होतो की, पाकिस्तानी नागरिक म्हणजे अनेक सिंधी लोक लाँग टर्म व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केले आहेत. त्यांनी भारत सोडण्याचं काहीच कारण नाही. केवळ मर्यादित कालावधीचा व्हिसा घेऊन भारतात आलेल्या नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. याबाबतची राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. उर्वरित काम काही वेळात पूर्ण होईल. अनेक पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात होते, त्यांची ओळख पटवून त्यांना माघारी पाठवलं आहे, असे त्यांनी सांगितले. 

वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार 

अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचे वक्तव्य करून जे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवले. नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितले. तिथे वडेट्टीवार होते का? हे इथे बसून अशा प्रकारचे वक्तव्य करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळताय, हे अतिशय वाईट आहे, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

India Vs Pakistan War: पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली