India Vs Pakistan War: काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराच्या (Indian Army) तिन्ही दलांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारत कोणत्याही क्षणी सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) किंवा एअर स्ट्राईक करेल, अशी भीती पाकिस्तानला (Pakistan) आहे. तरीही पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याच्या वल्गना करत आहे. परंतु, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या इंधन आणि युद्धसामुग्रीची चणचण आहे. त्यामुळे पाकिस्तानने अन्य देशांकडे मदतीची मागणी केली होती. या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देत तुर्कस्तानने (Turkastan) पाकिस्तानला दारुगोळा पाठवला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, तुर्कस्तानची ए 130 विमाने दारुगोळा घेऊन पाकिस्तानात पोहोचली आहेत. या विमानांमध्ये दारुगोळ्याचा खूप मोठा साठा असल्याचे सांगितले जाते. तसेच तुर्कस्तान पाकिस्तानला काही लढाऊ विमानं देणार असल्याचीही माहिती आहे. कालच चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर तुर्कस्तान आणि चीन हे दोन देश सर्वप्रथम पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक कुमक पुरवतील, असा अंदाज आहे. तुर्कस्तानने यापूर्वीही अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी, आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध तयार झाले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक कोंडी करण्यासाठी दिल्लीत महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. सोमवारी दिल्लीत पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 7 लोककल्याण मार्ग येते नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अझरबैजानचा पाकिस्तानला झटका, भारताशी मैत्री

एकीकडे तुर्कस्तानने पाकला मदत केली असली तरी पाकिस्तानच्या  मित्र देशांपैकी एक असलेल्या अझरबैजान या देशाने भारतासमोर मैत्रीचा हात समोर केला आहे. अझरबैजानने अहमदाबादला थेट विमानसेवा सुरु केली आहे. अझरबैजानची राजधानी असलेल्या बाकू येथून आता अहमदाबादला थेट विमान जाईल. 4 जुलैपासून ही विमानसेवा सुरु होईल. आठवड्यातून चार वेळा बाकुहून अहमदाबादला विमान जाईल. हा पाकिस्तानसाठी खूप मोठा झटका मानला जात आहे. 

आणखी वाचा

कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?