मुंबई : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji maharaj) पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर माफी मागितली. तसेच आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. यानंतर आज महाविकास आघाडीकडून सरकारच्या विरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र डागले. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले. आता यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 


चित्रा वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे.


हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब


ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आहे. आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले. लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही, असे पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. 


नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?


तुम्ही कुणाकुणाची माफी मागणार आहात? भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार, राममंदिर गळतंय त्याची माफी मागणार, की घाई गडबडीने बांधलेलं संसद गळतंय म्हणून माफी मागणार, दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळत आहे. कशाकशाची माफी मागणार? महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करत नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


आणखी वाचा