लातूर : मागच्या वर्षी जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी बीड (Beed) जाळलं, हा घाव ओबीसींच्या मुळावरचा आहे. आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं होतं, आता आरक्षण वाचवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे, असे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले. लातूर (Latur) जिल्ह्यातील भरत कराड या रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात आपला जीव दिला. त्यामुळे, छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांनी लातूरमधील वांगदरी गावात जाऊन कराड कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी, भरत कराड यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीही आपण घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यात मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा शासन आदेश जारी केल्याने ओबीसी नेते एकटवले असून या जीआरचा तीव्र विरोध केला जात आहे.
आम्ही का आलो हे सांगायला नको, आमचा भरत कराड प्रत्येक ओबीसी लढ्यात तो हजर राहायचा एक ध्यास त्याने घेतला होता. आमचं ओबीसी आरक्षण कमी होत कामा नये, भरत कराडसारख्या कित्येकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भरत कराडने आरक्षण टिकवण्यासाठी लढा दिला. आम्ही काय मागतो, सरकारने मराठा समाजाला 10% टक्के आरक्षण दिले, मोदी साहेबांनी EWS आरक्षणही दिले. तुम्हाला फायदा झाला, आमचा विरोध नाही. पण, आता ते म्हणतात आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या, आमच्याकडे 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिलं आहे, असे म्हणत ओबीसीतून मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध असल्याचे छगन भुजबळ यांनी पुन्हा स्पष्ट केले.
भरत कराडच्या लेकराचं शिक्षण आपण करूयात, काही कमी पडलं तर आम्ही आहोत. कराड कुटुंबाला संभाळायचं काम मी तुमच्यावर सोपवून जातो आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. यावेळी, ग्रामस्थांकडून भरत कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाने 25 हजार कोटींचा निधी दिला आहे. मात्र, मागच्या बजेटमध्ये ओबीसींच्या कामासाठी केवळ 5 कोटी दिले, असे म्हणत भुजबळ यांनी आपल्याच महायुती सरकारला घरचा अहेर दिला.
ओबीसी महामंडळाला केवळ 5 कोटी
ओबीसी महामंडळाला केवळ पाच कोटी देण्यात आले, हा काय न्याय आहे. आमच्या लोकात बोलण्याची हिंमत नाही. भरत कराड हा आरक्षण गेले म्हणून ओरडत गेला. मला जगाला सांगायचं आहे, आम्ही हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, आम्ही पूर्ण ताकतीने लढू, आता सुद्धा लढायचं आहे, आत्महत्या करू नका, आम्ही आहोत. आधी आम्ही संपू, नंतर तुम्ही काय करायचे ते करा, अशा शब्दात भुजबळ यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत ओबीसी समाजाला आवाहन केले.
आपण लढू, पण कुटुंबही सांभाळायचं आहे
तुम्ही लढण्याचा जिद्दीने पुढे या. आपण लोकशाही मार्गाने पुढे जाऊ, रोज नवीन घोषणा करत आहेत. महाराष्ट्रात लोकशाही नाही का? बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नाही का? कोर्ट नाही का? दहशत, दादागिरी करता, आंबेडकरांचा कायदा नाही का? कोर्ट नाही का? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. भरत कराड बद्दल प्रेम असेल तर शपथ घ्या, अठरापगड जातीने एकजूट तोडू द्यायची नाही, आम्ही लढू.. अनेक वर्षांनी मिळालेले आरक्षण निश्चित टीकवल्याशिवाय राहणार नाही. हात जोडून सांगतो, ओबीसी तरुणांनो बलिदानाचा हा मार्ग स्वीकारू नका. राज्यात देशात लोकशाही आहे, आपण त्या मार्गाने आरक्षण टिकवून ठेऊ, कितीही दादागिरी असू द्या, काही करा. आपण कुटुंब सांभाळायचं आहे, असे आवाहनही भुजबळांनी केले.