Chandrakant Patil on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा शनिवारी तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरु आहेत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली होती. यानंतर मराठा उपसमिती पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी दुसर्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ते शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांवर टीकास्त्र सोडले. आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत . आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही अन्यथा नवीन वाद तयार होईल, असे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Maratha Reservation: शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते, मग मराठा आरक्षण का दिले नाही; चंद्रकांत पाटलांचा सवाल
सगेसोयरेबाबत अध्यादेशही निघालेला आहे आणि आपल्या पितृसत्ता समाजाच्या नियमानुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात आणि अशा सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकाला दाखला मिळतो त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील दहा जणांना याचा फायदा होतो, याचा विचार करता लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे . शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तामिळनाडू प्रमाणे का आरक्षण दिले नाही ही फक्त वेळ काढायचे म्हणजे धकविण्याचे आहे. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात असून ते सर्वोच्च न्यायालयात टिकणारे नाही. सुनावणीला आल्यावर हेही समोर येईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात फरक आहे तो देवेंद्र फडणवीस खरे असूनही बोलायचे टाळतात आणि अजितदादा जे काय आहे ते ठोकून बोलतात आणि म्हणूनच त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Chandrakant Patil: राजकीय आरक्षणासाठी ही सगळी धडपड सुरु, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे कधीही खोटे बोलत नाहीत मात्र काही लोक नेहमीच खोटं बोल पण रेटून बोल असे करीत असल्याचा टोला लगावला. सध्या सुरू असलेले आंदोलन हे मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम आहे. हे राजकीय आरक्षण मिळवण्याची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडीटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.पितृसत्ताक पद्धतीने अंमलबजावणी झाली आहे. EWS आरक्षण हे खरे मराठ्यांचे आरक्षण आहे. मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जात मागास ठरवण्याचे अधिकार घटनेने केवळ मागासवर्गीय आयोगाला दिलेले आहेत, ते शिंदे समिती ठरवू शकत नाही. गावच्या सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून पूर्वी दिलेल्या एसईबीसीमध्ये राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
आणखी वाचा