मुंबई : माझी मुलं ही शिकलेली आहेत, हुशार आहेत, त्यांच्यावर माझं नियंत्रण आहे. माझ्या मुलांवर टीका करणाऱ्यांनी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पहिला पहावं असा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला. संजय राऊतांनी आपल्याला बोलायला प्रवृत्त करु नये अन्यथा मोठ्या गोष्टी बाहेर येतील असा इशाराही त्यांनी दिला. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "माझ्या मुलांवर माझं नियंत्रण असून त्यांच्या हातून कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही. त्या आधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पहावं. ते कोणाला भेटतात, काय करतात, कोणत्या केसेसमध्ये त्यांची नावं आहेत याची चौकशी करावी. शिवसेनेने वैयक्तिक टीका बंद केली नाही तर मीही प्रहार करणार. कोणाचा मुलगा कोणत्या केस मध्ये आहे आहे हे बाहेर काढणार."


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, "संजय राऊतांनी आपलं संदुक बाहेर काढावं, त्यांना कोण विचारतयं. आपल्या निराशेपोटी ते असं बोलत आहेत. ते शिवसेनेची वाट लावण्यासाठीच बोलतात. संजय राऊतांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागली."


लसीकरणासाठी टेंडर काढण्यात आलं आणि 12 टक्के कमिशन द्या अशी मागणी राज्य सरकारने केली असल्याचा आरोप राणेंनी केली. या सगळ्या गोष्टींची चौकशी केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 


शिवसेना घडायला माझाही हातभार
शिवसेना घडायला आपलाही हातभार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं. ते म्हणाले की, "ज्यावेळी बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता त्यावेळी त्यांनी मला फोन केला. मी त्यांच्याोसोबत सावलीसारखं राहिलो. मिळेत ते खाऊन रात्री काढल्या. मातोश्री बाहेर रात्रभर पहारा देत बसायचो." 


महाराष्ट्राशी दुजाभाव नाही
महाराष्ट्रातील कोणतेही काम असो, मी कोणताही भेदभाव न करता न्याय देणार. राज्यातील कोणतीही कामं ही अडथळ्यांविना करणार. कोकणवासियांनी आणि राज्यातील नागरिकांनी उद्योजक बनावं. त्यांना लागेत ती मदत मी करायला तरार असल्याचं नारायण राणे म्हणाले. 


अजित पवार अज्ञानी
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, "अजित पवार हे अज्ञानी आहेत. त्यांनी पहिला आपल्या खात्याकडे पहावं. एका रात्रीतून आपल्यावरील केस कशा कमी करायच्या हे अजित पवारांकडून शिकावं."


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या महाड येथील जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. मंगळवारी नारायण राणेच्या अटकेनं आणि रात्री उशीराने मिळालेल्या जामिनाने राजकारणाचा नुसता धुरळा उडाला होता. त्यानंतरही राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. ते अजूनही शमण्याची चिन्ह नाहीत.