Sushma Andhare slams Nishikant Dubey: भाजप खासदार निशिकांत दुबे हे मराठी माणसांना उचलून आपटून मारु, असे वक्तव्य करतात. त्यांची ही धमकी फक्त एकट्यादुकट्या व्यक्तीसाठी नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री आणि आमदारासाठी आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्हीदेखील मराठी आहात, ही धमकी तुम्हालाही आहे.  दुबेंची धमकी भाजपचे महाराष्ट्रातील तमाम मंत्री आणि सगळ्या भाजपाईंसाठी आहे. भाजपच्या तमाम मंत्र्यांनो त्याने तुम्हालाही तुडवायची भाषा केली आहे. आता त्याच्याकडून तुडवून घ्यायचे की निशिकांत दुबेला तुडवायचा, हे भाजपच्या मराठी आमदार आणि खासदारांनी ठरवावे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचा उमाळा फुटला होता. महाराष्ट्रात आम्ही कोणालाही हिंसा करुन देणार नाही, असे ते बोलत होते, तसा आविर्भाव दाखवत होते. मग आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जी भाषा वापरली आहे, ती कोणत्या शासन पद्धतीत बसते. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची काय भूमिका आहे? जेव्हा भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणतात की, आम्ही मराठी माणसाला आपटून आपटून मारु. हिंमत असेल त्यांनी बाहेर पडावं मग आम्ही काय करायचं ते करु. पहिला वार आम्ही करणार नाही, पण आमच्यावर वार झाला तर तो हात मुळापासून उखडून टाकू, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. 

निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला दिलेली धमकी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या भाजप नेत्यांसाठी आहे. त्याने तुम्हाला तुडवायची भाषा केली आहे. तुमच्या पाठीला रबर नसेल, कणा असेल. तुम्हाला मराठीचा मान, अभिमान, मराठीचा ताठा आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं, हे भाजपच्या मराठी खासदारांनी ठरवावे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. 

Nishikant Dubey: निशिकांत दुबे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा , बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली.

आणखी वाचा

मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतीयांना मनसेकडून मारहाण, भाजप खासदार म्हणाले, 'आपल्या घरात कुत्राही वाघ असतो'