Nanded Lok Sabha Election Constituency : नांदेड : सरकार आमचं यायचं काही प्रश्न नव्हता निर्णय धाडसी होता. तो घेतला नाही तर 5 वर्ष विरोधी पक्षात राहून बोंबलत बसलो असतो, असं वक्तव्य भाजपचे (BJP) नेते खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी इथल्या सभेत केला. 1 महिन्यानंतर अशोक चव्हाण यांचे भोकर (Bhokar) मतदारसंघातील अर्धापूर येते जंगी स्वागत झालं. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. लोकांचा मनात काय आहे, 80 टक्के लोक मोदी म्हणत होते, त्यानंतर हा निर्णय मी घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे. 


भाजप नेते अशोक चव्हाण बोलताना म्हणाले की, "देशातील 80 ते 90 टक्के लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातही दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचं सरकार येण्याचा प्रश्न नव्हताच. मग काय करायचं? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो."


भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाण 


माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडून भाजपची कास धरली आहे. याचंच गिफ्ट म्हणून भाजपकडून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. आजवर काँग्रेसकडून प्रचार करणारे अशोक चव्हाण यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस खासदारांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. एवढंच नाहीतर भाजपचा 400 पारचा नारा खरा करण्यासाठी भाजप नेत्यांसोबतच अशोक चव्हाणांनीही कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी प्रचारसभा घेत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. 


भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाणांच्या नावाचाही समावेश आहे. यंदा राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण तयारीला लागले असून सभा, बैठका, रॅली यांचा धुरळा उडणार आहे. 


पाहा व्हिडीओ : Ashok Chavan : "निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो" - अशोक चव्हाण