Bihar Politics : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच तिकडे बिहारमध्येही (Bihar) पुढील 48 तासांत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधींशी (Sonia Gandhi) चर्चा केल्यानं एनडीएमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं बोललं जात आहे. त्यातच नितीशकुमार यांनी जेडीयूचे आमदार आणि खासदारांची पाटण्यात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी काल जेडीयूचे (JDU) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी पक्षातून राजीनामा दिलाय. भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान आरसीपी सिंह यांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे. राजीनाम्यानंतर आरसीपी सिंह (RP Singh) यांनी पक्षाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटण्यातील बैठकीत काय होणार? याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे काल दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीलाही नितीशकुमार गैरहजर राहिले होते. त्यामुळे जेडीयू आणि भाजपमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


बिहारमधील आघाडी सरकारबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय वर्तुळात नितीशकुमार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच, त्यांच्या नाराजीच्या कारणांचीही चर्चा आहे. जाणून घेऊया नितीशकुमार भाजपवर नाराज असण्याची महत्त्वाची कारणं... 


बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्यावर नाराजी 
 
बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांना हटवावं, अशी नितीश यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सिन्हा यांच्याबाबतची खदखद अनेकदा व्यक्त केली आहे. सिन्हा यांनी उघडपणे आपल्या सरकारवर प्रश्न उपस्थित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप नितीशकुमार यांनी वारंवार केला आहे. 


केंद्र सरकारमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही


जून 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारमध्ये जेडीयूला एकच पद ऑफर करण्यात आल्यानंतर नितीशकुमार भाजपवर नाराज झाले होते. बिहारच्या विस्तारित मंत्रिमंडळात त्यांनी पक्षाच्या आठ सहकाऱ्यांचा समावेश करून त्याचा बदला घेतला होता. आणि फक्त एक जागा भाजपसाठी रिकामी ठेवली होती.


राज्य आणि केंद्रात एकाचवेळी निवडणुका


जेडीयू प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विरोधात आहेत. राज्य आणि संसदेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना पीएम मोदींनी दिली आहे, ज्याला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. 


भाजपच्या मंत्र्यांच्या निवडीवरून नितीश नाराज


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील भाजप मंत्र्यांच्या निवडीत हस्तक्षेप करायचा आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असं झाल्यास, या निर्णयामुळे गृहमंत्री अमित शहा यांची बिहारवरील पकड कमकुवत होऊ शकते. अमित शाह यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना मंत्री म्हणून नियुक्त करून राज्य नियंत्रित केलं असल्याच्या चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bihar Politics: जेडीयू आणि भाजपमध्ये तणाव वाढला, नितीश कुमार यांनी सोनिया गांधींशी केला संपर्क