रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती दिली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर चर्चा होणार असल्याचं उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


दरम्यान, यावेळी बोलतांना उदय सामंत म्हणाले की, "मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात होणार आहे. मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. मात्र, मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे.  इम्पीरिकल डाटा गोळा करून आणि आयोगाला सांगून जमा झालेला इम्पीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार असल्याचं,” उदय सामंत म्हणाले.


आदित्य ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर...


मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत शनिवारी  मुंबईतील जुहू चौपाटीवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला होता. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर, आदित्य यांच्या टीकेला उत्तर देतांना उदय सामंत म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईच्या जनतेला काय वाटते हे महत्वाचे आहे. मुंबईची स्वच्छता करण्यासाठी आजपर्यंत कधीही कोणता मुख्यमंत्री रस्त्यावर उतरला नसल्याची लोकांची प्रतिक्रिया आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्याने कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेतला नाही, कोणताही मुख्यमंत्री नाल्यात उतरून सफाई कशी झाली हे पाहत नाही. त्यामुळे ज्यांनी कधी नाल्यात उतरून सफाई केली नाही, कधी रस्त्यावर येऊन स्वच्छता केली नाही त्यांना याचं महत्व कळणार नाही. तर, मुंबईकरांनी कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे, " असे उदय सामंत म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


सरकारला मोजत नाही, गिणत सुद्धा नाही अन् मरायलाही भीत नाही; मनोज जरांगे थेटच बोलले