अहिल्यानगर : राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) 2215 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले असून ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. त्याच, पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत जवळपास पाऊण तास चर्चा झाली असून राज्यातील अतिवृष्टीमुळे (Rain) झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यासाठी तातडीने मदत करण्याची मागणी सर्वांनी केली आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांनी आपल्या भाषणाही याचा उल्लेख केला. त्यावेळी, महाराष्ट्राचे तिन्ही नेते वापाऱ्यापेक्षाही कमी नाहीत, असेही म्हटले.
अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी, लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास संबोधित करताना अमित शाहांनी राज्यातील पूरस्थिती आणि पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात भाष्य केलं. मी आज इथे आलो, मला आनंद झाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या नावाने हा जिल्हा जोडला गेलेला आहे. औरंगाबाद शहराचे नाव आम्ही बदलले, हे तेच लोक करू शकतात, जे शिवछत्रपतींचे अनुयायी आहेत, तेच करु शकतात. जे औरंगजेब यांचे विचार पुढे घेऊन जातात, ते करु शकत नाहीत, असे म्हणत अमित शाहांनी नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला. हिंदुत्व सोडण्यावरुन विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर, अमित शाहांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त परस्थितीवर भाष्य करताना लवकरच मदत पाठवणार असल्याची घोषणाही केली.
सरकारने मदत केली (Government help to farmers)
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर यंदा इंद्रदेवाने आफत पाठवली आहे, 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या आहेत, त्यात नुकतेच अतिवृष्टीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत केली आहे. ज्यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली, 10 हजार रुपये मदत आणि 35 किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मदतीसाठी ई-केवायसी संदर्भात देखील शिथीलता दिली.
तुम्ही अहवाल पाठवा, आम्ही मदत पाठवतो (Amit shah package)
महाराष्ट्राचे त्रिमूर्ती जे आहेत, यातून एकही बनिया नाही, मात्र तिघेही बनियापेक्षा पक्के आहेत असे म्हणत काल तिघांनी माझ्यासोबत शेतकऱ्यांसंदर्भात बैठक केली, शेतकऱ्यांना मदतीसाठी मागणी केली, असे अमित शाह यांनी म्हटले. त्यावेळी, मी म्हणालो, महाराष्ट्र सरकारने अहवाला पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो. हे होऊ शकतं कारण शेतकऱ्यांची काळजी घेणारं हे सरकार आहे. आपल्या एनडीएच्या सर्वच आमदार-खासदारांनी सीएम रिलिफ फंडामध्ये एक महिन्याचे वेतन देऊन मदत केली आहे, अशी माहितीही अमित शाहांनी दिली.