Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायत निवडणुक निकालात अकोला जिल्ह्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'चाच दबदबा दिसून आला. यासोबत भाजपनं दुसऱ्या क्रमांकाचा यश प्राप्त केलं आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं तिसऱ्या क्रमांकाचं यश मिळवलंय. जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे गटानं बार्शीटाकळी तालूक्यातील एक ग्रामपंचायत जिंकत चंचूप्रवेश केलाय. तर प्रहार आणि मनसेंसारख्या पक्षांनीही प्रत्येकी दोन ग्रामपंचायती जिंकत जिल्ह्याच्या राजकारणात आपली उपस्थिती लावलीय. अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी जिल्ह्यातील तीस ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व राखलंय. तर जिल्ह्यातील 266 पैकी 203 ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार दिलेल्या वंचितनं 80 च्या जवळपास ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यात. तर वंचितच्या बंडखोरांनीही 45 च्या जवळपास ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. 


अकोला : ग्रामपंचायत निवडणुक दृष्टीक्षेप 


निवडणूक होत झालेल्या ग्रामपंचायती : 266
सरपंच पदाच्या जागा : 266
ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण जागा : 2074
सरपंच आणि सदस्य पदासाठीचे एकूण उमेदवार : 40857
अविरोध सरपंच : 04 : हिंगणी खुर्द (तेल्हारा), धामणगाव (अकोट), अकोली जहाँगीर (अकोट) आणि उमरी (मुर्तिजापुर) 
सरपंच पदासाठी एकही अर्ज न आलेल्या ग्रामपंचायती : 04 : बांबर्डा (अकोट), भौरद (अकोला), परंडा (बार्शिटाकळी) आणि गोंधळवाडी (पातूर) 
अविरोध निवडून आलेले सदस्य : 554
झालेले मतदान : 81.05 टक्के


निवडणुक झालेल्या तालूकानिहाय ग्रामपंचायती 


अकोला : 54
तेल्हारा : 23
अकोट : 37 
पातुर : 28 
बाळापुर : 26 
बार्शीटाकळी : 47 
मुर्तीजापुर : 51 



जिल्ह्यात वंचित बहूजन आघाडीची मुसंडी 


जिल्ह्यात पहिल्यांदाच वंचित बहूजन आघाडी थेटपणे ग्रामपंचायत निवडणुकीत उतरली होती. जिल्ह्यातील 266 पैकी 203 ग्रामपंचायतीत वंचितनं सरपंच पदासाठी आपले अधिकृत उमेदवार उतरवले होते. वंचितनं जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपली सत्ता राखली आहे. अकोला जिल्हा परिषदेसह चार पंचायत समित्यांवर वंचितची सत्ता आहे. अकोला जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा वंचितचा गड समजला जातो. आज अकोल्याचा ग्रामीण भागात आपणच 'ताकदवान' असल्याचं वंचितनं निकालातून दाखवून दिलं आहे. अकोला, अकोट, बाळापूर या तालूक्यात वंचितनं मोठी मुसंडी मारली आहे. वंचितनं जवळपास 80 ग्रामपंचायतींमध्ये आपली एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर जवळपास 45 ठिकाणी वंचितचे बंडखोर विजयी झाले आहेत. 


भाजपनंही वाढवली ग्रामीण भागात ताकद 


अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार आमदार भाजपचे आहेत. भाजपनं जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचं यश प्राप्त केलं आहे. भाजपनं जवळपास साठवर ग्रामपंचाती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. भाजपनं अकोला, तेल्हारा आणि बार्शीटाकळी तालूक्यात चांगलं यश मिळवलं आहे. भाजपची जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेपेक्षा पिछेहाट झाल्यानंतर ग्रामीण भागातलं हे यश त्यांना सुखावणारं आहे. मात्र, मुर्तिजापूर तालूक्यात बसलेला फटका येथील भाजपचे स्थानिक आमदार हरिष पिंपळे यांची चिंता वाढवणारा आहे. 2019 मध्ये हरिष पिंपळे यांचा फक्त 1910 मतांनी विजय झाला होता. मुर्तिजापूरच्या निकालांनी भाजपची चिंता काही प्रमाणात वाढवली आहे. विशेष म्हणजे हरिष पिंपळेंचं गाव असलेल्या सोनाळा-परसोडा ग्रामपंचायतीत त्यांच्या समर्थक पॅनलचा पराभव झाला आहे़. शेलुवेताळ ग्रामपंचायतीत भाजपच्या अधिकृत पॅनलचा आमदार हरिष पिंपळेंनी पराभव घडवून आणल्याचा आरोप करीत माजी सभापती भावना सरदार आणि त्यांचे पती राजू सरदार यांनी भाजपला 'रामराम' करण्याचा निर्णय घेतला आहे. 


फुटीनंतर ठाकरे गटाचं 'माफक' यश


अकोला जिल्हा परिषदेत वंचितनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेतील फुटीनंतरही पक्षाचे बाळापुरचे आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेत. त्यांच्या मतदारसंघातील बाळापूर आणि पातूर तालूक्यात 54 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्याय. यात नितीन देशमुखांना अपेक्षित निर्भेळ यश प्राप्त करता आलं नाही. मात्र, शिवसेनेनं अकोला, अकोट तालूक्यात चांगलं यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे निंबोरा, कुंभारी, कळंबेश्वर, धामणा, निंबी मालोकार या ग्रामपंचायतीत ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रस्थापितांना धुळ चारलीय. शिवसेनेनं जिल्हाभरात 40 वर ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे. 


बोंदरखेडमध्ये 'शिवशक्ती-भिमशक्ती' विजयी, बाभूळगावात पराभव 


उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती या राज्यातील संभाव्य आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. दोन्ही पक्षांच्या मैत्रीवर राज्यातली पहिली ग्रामपंचायत विजयी झाली आहे. सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले विजयी झालेत. या ठिकाणी दोन्ही पक्षांचे सर्वच्या सर्व 7 सदस्य विजयी झाले आहेत. मात्र, अकोला शहरालगतच्या बाभूळगाव ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची 'शिवशक्ती-़भिमशक्ती पराभूत झाली. सरपंचपदी वंचितचे बंडखोर सुशिल सिरसाट विजयी झाले आहेत. शिवशक्ती-भिमशक्तीच्या प्रशांत सिरसाट यांचा त्यांनी पराभव केला. येथे पुतण्या सुशीलने काका प्रशांत यांचा पराभव केला आहे. येथे सरपंच पदासह 13 पैकी 8 जागा बंडखोर गटाने जिंकल्यात. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं बाभूळगावच्या निकालाकडे लक्ष होतं.


जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात शिंदे गटाचा 'चंचुप्रवेश' 


सेनेतील फुटीनंतर अकोल्यात शिंदे गटाला पहिलं यश मिळालं आहे. बार्शीटाकळी तालूक्यातील उमरदरी ग्रामपंचायतीवर शिंदे गटानं सरपंच पदासह सर्वच्या सर्व सात जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाचे गोपाल चव्हाण विजयी झाले आहेत. 


'मनसे आणि प्रहार'चीही निकालात 'हजेरी' 


जिल्ह्यात मनसे आणि 'प्रहार'नं प्रत्येकी दोन ग्रामपंचायती जिंकत जिल्ह्याच्या राजकारणात आपली हजेरी लावली. मनसेनं अकोला तालूक्यातील मासा ग्रामापंचायतीवर परत बहूमतानं आपली सत्ता प्रस्थापित केली. सरपंचपदी मनसेचे तालूकाप्रमुख सतिश फाले विजयी झालेत. तर सागद ग्रामपंचायतीवर वनिता विठ्ठल उमरावते विजयी झाल्यात. अकोट तालूक्यातील बेलुरा ग्रामपंचायतीवर बच्चू कडूंच्या प्रहारचा झेंडा फडकला. सरंपचपदी राम मंगळे विजयी झालेत. अकोट तालुक्यात प्रहारनं आणखी एक ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. 


विजयी ग्रामपंचायतीवर वंचित, भाजप अन ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे 


आजच्या निकालानंतर विजय झालेल्या अनेक ग्रामपंचायतींवर वंचित, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दावे केल्याने संभ्रम उडाला आहे. वंचित आणि भाजपने अनेक ग्रामपंचायत आणि सरपंच पदांचे उमेदवार आपलेच असल्याचा दावा केला आहे. या तिन्ही पक्षांच्या दाव्यानुसार सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याच आल्याचं या पक्षांनी सांगितलं आहे. वंचितनं 140, भाजपाने 123 तर ठाकरेंच्या शिवसेनेने 113 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत खरी कुणाच्या ताब्यात आहे?, असा संभ्रम लोकांमध्ये पाहायला मिळतो आहे.


वंचितच्या बंडखोरांची अनेक ठिकाणी सत्ता 


या निवडणुकीत पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीने सरपंच पदासाठी आपले अधिकृत उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अनेक गावांमध्ये वंचितच्याच कार्यकर्त्यांनी आपल्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध आपले पॅनल टाकत बंडखोरी केली होती. या बंडखोरांनी जवळपास 45 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचं निकालावरून समोर येत आहे. आता निकालानंतर हे सर्व बंडखोर आपलेच असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.


जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील पक्षीय बलाबल 


एकूण 266 
घोषित : 266


वंचित : 80
वंचित बंडखोर : 45
ठाकरे गट : 40
शिंदे गट : 01
भाजप : 62
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 03
मनसे : 01य2
प्रहार : 02
अपक्ष आणि इतर : 28