Abu Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना अबू आझमी म्हणाले की, दहशतवादी आरामात आले, पर्यटकांना गोळ्या मारुन निघून गेले. यावर भारत सरकारने चिंतन केले पाहिजे. तसेच पॅलेस्टाईनसोबत आमचा धर्म जुळला आहे, असं वादग्रस्त विधानही अबू आझमी यांनी केलं आहे. दरम्यान फिलिपाईन्सचे झेंडे जाळाल तर विरोध करू, अशी जाहीर भूमिका अबू आझमींनी स्पष्ट केली.
जात विचारून साहित्य खरेदी करायला सांगणारेही दहशतवादी आहेत, असा निशाणा अबू आझमींनी नाव न घेता मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेंवर साधला. तसेच भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही. मुस्लिमांना अनेक ठिकाणी त्रास दिला जातोय. देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप देखील अबू आझमी यांनी केला आहे. अबू आझमींनी केलेल्या या विधानानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तसेच आता भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
अबू आझमींनी औरंगजेबचेही केलं होतं समर्थन-
अबू आझमी यांनी मार्च 2025 मध्ये औरंगजेबचे समर्थन करणारे विधान केले होते. या विधानामुळे महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ उडाला आणि त्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. त्यांनी नंतर हे विधान मागे घेतले, परंतु तरीही त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि न्यायालयाने त्यांना जबाबदारीने वक्तव्य करण्याचा सल्ला दिला .