विरार, पालघर : बनावट कागदपत्रांच्या आधारे 55 अनधिकृत इमारती बांधल्या प्रकरणाच्या तपासात आता 55 इमारतीपैकी पहिल्या दोन इमारतीवर विरार पोलीस ठाण्यात (Virar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. गुरुकृपा 1 आणि गुरुकृपा 2 या दोन इमारतीच्या जमीन मालकासंह सात विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात आता तक्रारदार याला काही बिल्डरांचे हस्तक धमकी देत असल्याने, तक्रारदारांच्या जीवितेला धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर यात आरोपींनी मयत झालेल्या वास्तुविशारदाच्या नावाने बनावट आराखडा तयार केल्याच ही उघड झालं आहे. याशिवाय आरोपींकडे वकील तसेच डॉक्टरांच्या नावाने बनावट शिक्के आढळले आहेत. 


विरारच्या कारगील नगर येथील गुरुकृपा अपार्टमेंट इमारत अंत्यत दाटीवाटीत ही इमारत, बोगस कागदपत्राच्या आधारे बनवली आहे. ज्या बनावट कागदपत्रांच्या आधारे 55 अनधिकृत इमारती बांधल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं. त्यात आता काल गुरुवारी दोन इमारतीवर गुन्हे दाखल झाले आहेत. निजामुद्दीन पटेल, संज्यात आलेस लोप, तेरेस फ्रान्सिंस लुद्रिक, मच्छिंद्र मारुती व्हनमाने, दिलीप अनंत अडखळे, प्रशांत मधुकर पाटील, देवेंद्र केशव माजी या सात विकासकांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे तसेच एआरटीपीए कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


चौकशीत धक्कादायक माहिती समोर 


या प्रकरणाचा तपास सुरू असताना, आता अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बोगस इमारतीचा आराखडा प्लॅन विरारमधील प्रसिद्ध वास्तुविशारद (आर्किटेक्ट) के. डी. मिस्त्री यांच्या नावाने 2019 मध्ये बनविण्यात आला होता. मात्र केडी मिस्त्री यांचे 2016 मध्येच निधन झाले होते. तर रुद्रांश इमारतीवर वर गुन्हा दाखल करणाऱ्या निझिया खान यांना बिल्डरांच्या हस्तकांची जीवे ठार मारण्याची धमकी येत आहे. 


विरार पोलिसांनी पालिकेतून मिस्त्री यांच्या मृत्यूचा दाखला मागवला आहे. गुरुवारी पोलिसांनी मयत के. डी. मिस्त्री यांचा मुलगा अतुलभाई मिस्त्री यांचादेखील जबाब नोंदवला आहे. तर के.डी. मिस्त्री यांच्याशिवाय वसईतील प्रतिष्ठीत वकील ॲड. नंदन भगत यांच्याही नावे बोगस लेटर हेड आणि बनावट स्टँम्प बनवले आहेत. त्यामुळे त्यांनी ही आज विरार पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात आणखीन एका वकिलाचा ही जबाब नोंदवण्यात येणार आहे. 


या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी अजूनही न्यायायलीन कोठडीत आहेत. त्यांची नव्याने पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. तर यात आणखीन ही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ज्या ज्या विभागात त्या इमारती असतील त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे.