पालघर: सोलापूर, नाशिक, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्या टोळीचे कंबरडे मोडण्यात त्यांना यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोजच या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. ललित पाटीलल काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्यानंतर तपासाला वेग आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेने ही गुप्त कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडे माहिती नाही. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू होता. या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आले आहे.