पालघर: बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले. पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गावाच्या हद्दीत रेमी कंपनीसमोर हा विचित्र अपघात घडला. अपघातानंतर वाहचालक फरार झाला आहे. ही घटना बुधवारी, 5 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. उज्ज्वला जाधव (रा. देवकोप, तांडेलपाडा) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.


उज्वला जाधव या परिचारिका असून बोईसर येथील एका रुग्णालयात त्या काम करत होत्या. सायंकाळी त्या रिक्षातून कामावरून घरी जात होत्या. यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने या रिक्षासह मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षा आणि मोटरसायकलसह त्या जीपचाही चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्ज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच दुचाकीवरील समीर लढे आणि सुनीता वाढण यांना पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्ज्वला जाधव यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर रामभाऊ सापटे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जीप चालक फरार असून याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.


ट्रक व दुचाकीची धडक,दोन मुलांचा दुर्दैवी अंत


सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. यात ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. देवदत्त दिलीप शिंदे (वय 20) आणि यशराज नाना शिंदे (वय 15) असे या दोघा  मुलांची नावे असून दोघेजण जत तालुक्यातील शेगाव गावा मधीलच रहिवाशी आहेत. 


अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरूण चालक म्हणून काम करीत होता. तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. दोघेही शेगावमध्ये राहत होते. मात्र या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.


ही बातमी वाचा: