Palghar News: पालघर जिल्ह्याच्या (Palghar District) ग्रामीण भागात अजूनही आरोग्यवस्था बळकट झाल्याचे चित्र दिसून येत नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या पाच वर्षात बाल आणि माता मृत्यूंच्या प्रमाणात घट होत असली तरीही स्थिती काळजी करावी अशी आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि मातामृत्यूचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. वर्ष 2021-22 मध्ये तब्बल 294 बालमृत्यू आणि 20 मातांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर 2022-23 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 151 बालमृत्यू तर 7 मातांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. यातील सर्वाधिक बालमृत्यू हे जव्हार, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यातील आहेत. या आकडेवारीमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.


पालघर जिल्ह्यात अपुऱ्या असलेल्या आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या अभावामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने यापैकी बहुतांशी बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबई , ठाणे आणि नाशिक या महानगरांलगत असलेल्या पालघरमध्ये आजही बाळ मृत्यू सारख्या गंभीर प्रश्नावर मात करण्यात प्रशासन आणि शासन हे दोन्हीही अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहेत.
 
तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालमृत्यू, माता मृत्यू, बेरोजगारी, कुपोषण यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, नवीन जिल्ह्याच्या निर्मितीनंतर आजही हे प्रश्न कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागात आजही आरोग्य सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणांमुळे येथील बालकांना आणि गरोदर मातांना वेळेत उपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाल्याचही उघड झाले आहे.


आदिवासी विकास विभाग आणि शासनाच्या इतर विभागांमार्फत ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयी सुविधांसाठी वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही खर्च केला जातो. त्याचा गवगवा येथील लोकप्रतिनिधी नेहमीच करताना दिसून येतात. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना देखील आजही येथील दुर्गम भाग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने हा निधी नेमका जातो कुठे असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


पालघरच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड या भाग आदिवासीबहुल विभाग आहे. या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांच्या विकास कामांमध्ये होणाऱ्या निधीतील अपहारांच्या आजपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आजही सरकारकडून योग्य दखल घेऊन कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील विकास कामांवर खर्च होणाऱ्या निधीचा योग्य फायदा येथील तळागाळातील नागरिकांना होताना दिसून येत नाही. आता समोर आलेल्या बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या धक्कादायक आकडेवारीनंतर तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


>> पालघरमधील आतापर्यंत बाल मृत्यू


> वर्ष 2014-15: बालमृत्यू  626 


> वर्ष 2015-16: बालमृत्यू  565 


> वर्ष 2016-17:  बालमृत्यू 557, मातामृत्यू 18 


> वर्ष 2017-18: बालमृत्यू 469, मातामृत्यू 19


> वर्ष 2018-19:  बालमृत्यू 348, मातामृत्यू 13


> वर्ष 2019-20:  बालमृत्यू 303,  मातामृत्यू 10


> वर्ष 2020-21: बालमृत्यू 296, माता मृत्यू 12


> वर्ष 2021-22: बालमृत्यू 296, मातामृत्यू 20


> वर्ष 2022-23: (ऑक्टोबरपर्यंत ) बालमृत्यू 151, मातामृत्यू 07