मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा तिढा सुटत नसल्याने आता बिनखात्यांच्या मंत्र्यांसह आमदारांची नाराजी शिगेला पोहचली आहे. याचाच फायदा उचलण्यासाठी भाजप दबा धरून बसल्याची चर्चा आहे. नाराज आमदारांना गळाला लावून पुन्हा एकदा महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याच्या भाजपमध्ये हालचालींना वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे.


आज सकाळी अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची बातमी येताच ठाकरे सरकारमध्ये एकच खळबळ उडाली. पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राज्यात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगू लागली. कर्नाटकमध्ये काँग्रेस - जेडीएसच्या सरकारमध्ये काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी आणि आनंद सिंघ या आमदारांनी राजीनामा देऊन अशीच खळबळ उडवली होती. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांना फोडून भाजप पुन्हा सत्तेवर आलं. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होऊ शकते अशी शक्यता कर्नाटक पॅटर्नमध्ये सक्रिय असलेल्या प्रसाद लाड यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केली. यासाठी मंत्रिपद हुकलेल्या आमदारांना भाजपकडून संपर्क होत असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली.

काय असेल भाजपचा प्लॅन ?

24 जानेवारीपर्यंत संकेत मिळेपर्यंत भाजप वाट पाहणार आहे. त्यानंतर राज्यात ऑपरेशन लोटस सक्रिय होऊ शकतं. कर्नाटकात भाजप श्रेष्ठींनी 18 आमदार फोडण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र महाराष्ट्रात हा आकडा किमान 28 आमदारांपर्यंत नेण्याचं उद्धिष्ट आहे, अशी माहिती आहे.

सध्या शिवसेनेतून 13 तर काँग्रेस - राष्ट्रवादीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मात्र, महाराष्ट्राला कर्नाटक समजू नये कारण 'ऑपरेशन लोटसला' घायाळ करण्यासाठी 'ऑपरेशन धनुष्यबाण' तयार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे..

त्यामुळं कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार का आणि ठाकरेंचा कुमार स्वामी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी होणार का हे येणारा काळच ठरवेल.

सरकार स्थापनेच्या महिनाभरानंतरही तिढा सुटेना
उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांसह शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. 28 तारखेला मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना अनेक दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणूनच फिरावं लागलं. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी या सहा मंत्र्यांना 12 डिसेंबर रोजी तात्पुरतं खातेवाटप केलं गेलं. त्यानंतर 18 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अखेर 30 तारखेला विस्तार झाला. यात नव्या 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता विस्तार होऊन पाच दिवस होऊनही खातेवाटप झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खातेवाटपासाठी बैठकांची मालिका गेल्या पाच दिवसात सुरू आहे.