नागपूर: दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे विविध कागदपत्रांसाठी महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र मागण्यात येते. दुसरीकडे स्टॅम्प पेपर विक्रेत्यांकडून शंभर रुपयांचा स्टॅम्पपेपर 110 ते 120 रुपयात विकण्यात येतो. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही, तरी नागरिक मुद्रांक  खरेदी करत आहेत. सर्व विभागांनी संबंधितांना या संदर्भातील सूचना द्याव्यात व त्याचे अनुपालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक आर. विमला यांनी  दिले आहे. त्यासोबतच नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.


दहावी, बारावी व इतर शैक्षणिक विभागाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शपथपत्र,आवश्यक जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रास 100 रुपयाचे मुद्रांक लावण्याची सवय नागरिकांना असल्याने किंवा संबंधित शासकीय विभागाकडून शपथपत्र व इतर प्रमाणपत्र 100 रुपयांच्या मुद्रांकावर सादर करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे पालकांना विनाकारण 100 रुपयाचे मुद्रांक खरेदी करणे भाग पडत आहेत. सर्व प्रकरणात जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी या प्रकरणासाठी मुद्रांक खरेदी करू नये, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे. याबाबत विभागातर्फे विशेष जनजागृती केली आहे. त्यासोबतच सर्व विभागांना सूचित करण्यात आले आहे. या बाबत पुन्हा जनजागृती  करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


शासकीय विभागांना निर्देश


सर्व विभागांनी सुध्दा या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. यापुढे शपथपत्र विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र,वास्तव्य प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी मुद्रांकाची मागणी नागरिकांना करण्यात येवू नये, असे स्पष्ट सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना 100 रुपयांचा मुद्रांक घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग काढणे सोयीचे होईल,असे त्या म्हणाल्या.