नाशिक : देशातंर्गत आणि परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात वाढ होत असल्याच गेल्या काही दिवसांत पाहायला मिळत आहे. कांद्याने सर्वासामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कांद्याची देशासह परदेशात वाढती मागणी, यामुळे या आठवड्याच्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांदा भाव खाऊ लागला आहे. नवीन लाल कांद्याने सोमवारी लासलगाव बाजार समितीत प्रति क्विंटल आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर नवी मुंबई एपीएमसी मार्केटला कांद्याची होणारी आवक घटल्याने याचा मोठा परिणाम कांद्यांच्या दरावर झाला आहे. 90 गाड्या कांदा एपीएमसीच्या मार्केटला दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यातील कांदा आवकीचा आकडा पाहता आज झालेली आवक अत्यल्प आहे. त्यामुळे आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ झालीय. नवीन कांदा शंभर रुपये तर जुना कांदा 120 रुपयांवर गेला आहे.


दिवसभरात देशात 50 हजार मेट्रिक टन कांद्याची मागणी असते. तर महिनाभरात 15 लाख मेट्रिक टन कांदा लागतो. एका कुटुंबातील पाच व्यक्तींना एक महिन्यासाठी सरासरी 4.755 किलो म्हणजेच पावणेपाच किलो कांदा लागतो. भारतात सुरवातीला पाच ते सहा राज्यात कांदा घेतला जायचा. आता देशभरातील 26 राज्यात घेतला जातो. पण आपल्या महाष्ट्रात कांदा येतो कुठून याबाबत जाणून घेऊया.

महाराष्ट्रात कांदा येतो कुठून?

  • ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून कांदा येतो

  • पाच सप्टेंबरच्या दरम्यान पुणे, चाकण आणि लोणंद या भागातून कांदा बाजारात येतो.

  • ऑक्टोबर 15 तारखेपासून नाशिक, धुळे, मध्यप्रदेश या ठिकाणचा कांदा येतो.

  • फेब्रुवारीच्या पहिला दुसरा आठवडा रब्बी हंगामातील विक्रीला येतो.

  • मार्च आणि एप्रिल महिन्यात साधारणत: नाशिकमधून कांदा बाजारात येतो.

  • मे महिन्यात बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातून कांदा महाराष्ट्रात येतो.

  • जुन, जुलै या कालावधीत खरीप हंगामाच्या आधीचा आणि नंतरचा कांदा बाजारात येतो.


Onion Price Effect | रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा पुरवठ्याचा विचार | ABP Majha