Nashik News Update : गावातील पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून पिण्याच्या पाण्याचे दररोज शुध्दीकरण करणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रणाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा न करता नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे आणि जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. 


मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी नांदगाव आणि चांदवड तालुक्यात सरपंच व ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील एकाही गावात अशुध्द पाण्यामुळे कुणालाही त्रास झाल्यास याबाबत ग्रामसेवक व सरपंचांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.


पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सवदारे घेण्यात आली. या बैठकीत पाणी शुध्दीकरणाबाबत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असून ग्रामपंचायत हद्दीत असणारे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत परिसर यांची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने पाणी दुषित होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात उच्चतम दर्जाचे टी.सी.एल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
 
गावातील पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची  (स्त्रोत ते शेवटच्या नळ जोडणी पर्यंत) तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही बैठकी देण्यात आल्या. पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात अशा वेळी गावातील इतर स्रोतांचा वापर करण्यासाठी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी  करून पाणी पुरवठा करण्यास उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले.


गटविकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन त्यामध्ये गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुध्दीकरण करणे, गावातील सर्व कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, गावातील सर्व परिसराची स्वच्छता करणे आदी कामे करण्याबाबत माहिती देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. 


एकाही ग्रामपंचायतीमध्ये मुदत संपलेली किंवा कमी क्लोरीन असलेली टी.सी.एल. आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही बनसोड यांनी यावेळी दिले. गावात ज्या-ज्या ठिकाणाहून पिण्याचे पाणी घेतले जाते तेथे पाणी शुध्दीकरण करणे आवश्यक असून पावसाळयाच्या दिवसात याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना बनसोड यांनी दिल्या. बैठकीत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम याबाबतही आढावा घेण्यात आला.