मालेगाव : दिव्यांग व्यक्ती सर्वसामान्य लोकांसारखी कामं करू शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. मात्र, मालेगावमधील भारती जाधव या महिलेनं हा दावा खोटा ठरवलाय. भारती चक्क चारचाकी गाडी चालवत शाळेतील मुलांना ने-आण करण्याचं काम यशस्वीरित्या करुन आपला उदर निर्वाह करीत आहेत. भारती जाधव ह्या दोन्ही हाताने अपंग आहेत. मात्र, या अपंगत्वावर मात करत त्यांनी आपल्यासोबत कुटुंबाचीही जबाबदारी घेतली आहे. त्यांचं हे कर्तृत्व पाहून मालेगाव शहरातील नागरिकही त्यांना सलाम करत आहेत.
भारती ताई जाधव 13 वर्षांच्या असताना त्यांच्या दोन्ही हातांना अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना कुठलीही वस्तू उचलायला किंवा काम करता येत नव्हते. अशातच वयात आल्यावर त्यांचं लग्न झाले. मात्र, काही दिवसातच त्यांना नवऱ्यापासून वेगळे राहण्याची वेळ आली. यातून खचून न जाता आपल्या आईसोबत त्या राहू लागल्या. मात्र, प्रश्न होता तो उदरनिर्वाहाचा. अशाच वेळी त्यांनी बँकेकडून कर्ज घेत एक मारुती व्हॅन खरेदी केली आणि शाळेतील मुलांना ने-आण करण्याचा व्यवसाय त्या करु लागल्या. गाडीवर एक चालक पगारी ठेवला. मात्र, या चालकाच्या लहरीपणामुळे तो नंतर व्यवस्थित काम करत नसल्याने भारती यांनी घेतलेल्या गाडीच्या बँकेचे कर्ज थकू लागले आणि चालकावर विसंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः गाडी चालवायची असा त्यांनी निर्णय घेतला. चालकाला सोबत घेत अवघ्या पंधरा दिवसात त्या गाडी चालवायला शिकल्या.


'आवरा रे या महिलांना कोणीतरी', दादरमध्ये क्लीन-अप मार्शलची दहशत

हाताला व्यंग असल्याने घरातील काम करताना त्यांच्या आईची मदत त्यांना होते. मात्र, बाहेर निघताना मात्र गाडीची साफ-सफाई आणि गाडी घेऊन निघताना प्रत्येक पालकांना मोबाईलवर संपर्क करीत त्या गाडी घेऊन वेळेवर पोहचत असतात. अनेकवेळा गाडी गॅरेजवर कामाला नेत असताना पुरुष मक्तेदारी असलेल्या ठिकाणी अनेकवेळा खाली मान घालण्याची वेळ आली. तर त्यांच्या अपंगत्वामुळे एका शाळेने विद्यार्थ्यांना तुमच्या व्हॅनमधून ने-आण करण्यास मनाई केली. काम सुटले तरी हार न मानता त्यांनी दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना नेण्यासाठी सुरुवात केली. भारती यांच्या हाताला दिव्यांगपणा असला तरी त्या सफाईदारपणे वाहन चालवू शकतात. त्यामुळे त्यांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवानासुध्दा मिळाला. आपल्या कामावर असलेली निष्ठा आणि मुलांबरोबर असलेले प्रेमाचे संबंध यामुळे पालकसुध्दा निर्धास्त असतात. आपल्या पदरी अपंगत्व असल्याचा बाऊ न करता भारती जाधव या यशस्वी चालक बनल्या. आपल्या कुटुंबाला आधार देत मालेगाव शहरातील त्या पहिल्या अपंग चालक ठरल्या आहेत. त्यांचं काम पाहून अनेकजण त्यांना सलाम करतात.

Women Rickshaw Driver | गृहिणी ते रिक्षाचालक, स्मिता रामाणे यांचा आव्हानात्मक प्रवास | ABP Majha